पुणे : राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. त्यामुळए गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि मनसे युतीची चर्चा होत असतानाच आता पवार काका-पुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. कारण पुण्यातील साखर आयुक्त कार्यालय येथे कृषी क्षेत्रात एआय वापराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (21 एप्रिल) बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र आल्याने सध्या राज्याच्या वातवारणात चर्चा होताना दिसत आहे. याप्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar and Ajit Pawar reunite at the Vasantdada Institute meeting in Pune)
पुण्यातील साखर आयुक्त कार्यालय येथील बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. या बैठकीत तब्बल अडीच तास काका-पुतणे एकमेकांच्या शेजारी बसल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे ही बैठक संपल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह शरद पवार आणि अजित पवार यांची वेगळी बैठक पार पडली. त्यामुळे आता ठाकरे-मनसे युतीच्या चर्चेवेळी शरद पवार आणि अजित पवार देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – Politics : मनसे भरवणार प्रतिपालिका सभागृह; आदित्य ठाकरेंसह इतर पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण
अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गाठीभेटींबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, साखरपुडा कार्यक्रम हा परिवारातील आहे. त्यामुळे बाकीच्यांनी त्यावर काही चर्चा करण्याची गरज नाही. तो पवार कुटुंबियांच्या अंतर्गत प्रश्न आहे. तसेच इतर ठिकाणी आम्ही संस्था म्हणून हजर राहतो. रयत शिक्षण संस्था ही चांगली संस्था आहे. त्यामुळे तिथे एआयचा कसा वापर करता येईल? यावर विचार सुरू आहे. आजची बैठक ही एआयबाबत होती. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यावर चर्चा करण्यासाठी इतर नेत्यांसह एकत्रित बैठकीला बसावं लागतं. त्यामुळे काही विषय राजकारण पलीकडे बघायचे असतात. निवडणुका झाल्या असून जनतेच्या काही अपेक्षा आहेत. यासाठी माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणे ही आपली संस्कृती आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
हेही वाचा – Thackeray brothers : संजय राऊत म्हणतात – भूतकाळात आता वळायचं नाही, असे आमचं ठरलंय