Pahalgam Terror Attack News : धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह पाच जण पहलगामपासून 50 किलोमीटरवर आपल्या काही कामासाठी गेल्या होत्या. दहशतवादी हल्ल्यामुळे त्या ठिकाणी अडकले आहेत. पार्वती जोगी ,साक्षी जोगी, काजल गुरु (अहिल्यानगर) पिंकी गुरु अहिल्यानगर हे अडकलेल्या तृतीयपंथी पर्यटकांची नावे आहेत. बुधवारपासून कुठल्याही प्रकारची व्यवस्था होत नसल्याने तृतीयपंथीय दहशतीखाली आहेत.
नावावर पर्यटकांना गोळ्या मारणे योग्य नाही, अशी भावना अडकलेल्या महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी व्यक्त केली आहे, त्याचबरोबर सर्व तृतीयपंथी सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु प्रशासनाने लवकरात लवकर त्यांना सुरक्षित घरी पोहोचवावे, अशी मागणी या सर्व तृतीयपंथीयांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 54 पर्यटक जम्मूमध्ये अडकले
जम्मू-काश्मीरमधील येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील ५४ पर्यटक सध्या श्रीनगर आणि जम्मूजवळ अडकले असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे. यातील पाच जण आज हवाई मार्गे परतणार असून, उर्वरित ४९ जण जम्मूमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. या पर्यटकांमध्ये बुलढाणा शहरातील ५, शेगावमधील ३, नांदुरा आणि खामगाव येथील प्रत्येकी १७, तसेच जळगाव (खान्देश) येथील ४ व्यक्तींचा समावेश आहे. या ४९ जणांचा ग्रुप १८ एप्रिल रोजी मलकापूर रेल्वेस्थानकावरून जम्मूकडे रवाना झाला होता. १९ एप्रिल रोजी ते जम्मूला पोहोचले, मात्र ढगफुटीमुळे पुढचा प्रवास रोखण्यात आला. त्यानंतर कटरा मार्गे हे पर्यटक श्रीनगरला पोहोचले. पहलगाम हल्ल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी फक्त एक रात्र श्रीनगर येथे काढली आणि लगेचच परतीचा प्रवास सुरु केला आहे... अद्याप पर्यंत हे पर्यटक जिल्ह्यात पोहोचले नाहीत...
रत्नागिरीतील 42 जण सुखरुप
काश्मीरयेथे पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. रत्नागिरीमधील साक्षी पावसकर आणि रुचा खेडेकर या सिंधुदुर्गातील 6 नातेवाईकांसोबत कश्मीरला गेले होते. रत्नागिरी शिरगावमधील खलिफ मुकादम व कुटुंब एकूण 6 सदस्य हे अमृता ट्रॅव्हल्समार्फत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक श्रीनगर येथे हॉटलमध्ये सुखरुप आहेत. मनोज जठार, अनुश्री जठार व इतर 32 असे एकूण 34 सदस्य श्री टुरिझम मार्फत रत्नागिरी मधून काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक कटार,जम्मू येथे सुखरुप आहेत. हे पर्यटक आज रेल्वेने दिल्लीत येतील आणि 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे पोहोचतील.