Pahalgam Terror Attack: 22 एप्रिल 2025 हा काळा दिवस भारतीय कधीच विसणार नाहीत. कारण आनंद साजरा करण्यासाठी जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवर दहशदवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडाल्या. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे निर्णय घेतेले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला आहे.
अशात पाकिस्तान येथील नेते भारताला धमक्या देऊ लागले आहेत. आता यामध्ये जे नवीन नाव समोर आले आहे ते म्हणजे बिलावल भुट्टो. सिंधू नदीमध्ये आता भारतीयांचं रक्त वाहणार… असं वक्तव्य बिलावल भुट्टो यांनी केलं आहे. सध्या बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो ट्विट करत म्हणाले, ‘पहलगाम दुर्घटनेसाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. आपल्या कमकुवतपणा लपवण्यासाठी आणि आपल्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खोटे आरोप केले आहेत.’
बिलावल भुट्टो म्हणाले, ‘भारताने सिंधू पाणी करार एकतर्फी स्थगित केला आहे, ज्याअंतर्गत त्यांनी मान्य केलं आहे की सिंधू नदी पाकिस्तानची आहे. मी याठिकाणी सिंधू नदीजवळील सुक्कुरमध्ये उभे राहून भारताला सांगत आहे की सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील, मग या सिंधूमध्ये पाणी किंवा त्यांचं रक्त वाहूदे…’ असं देखील बिलावल म्हणाले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर, पाकिस्तान सरकारने वादग्रस्त कालवा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब प्रांतातील वाळवंटी प्रदेशाला सिंचन देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी महत्त्वाकांक्षी चोलिस्तान प्रकल्पाचे उद्घाटन केलं होतं. संबंधित निर्णयामुळे सिंध प्रांतात गोंधळ उडाला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) सह विविध राजकीय पक्षांनी प्रकल्पाविरुद्ध निदर्शने सुरू केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारलं आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान नाराज आहे आणि त्यांचे नेते सतत बेताल विधाने करत आहेत.