मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत नेहमीप्रमाणे यंदाही अडखळत सुरुवात केल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबई आयपीएल 2025 मध्ये रविवारी 27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबईचा या सामन्यातही विजयी घोडदौड कायम राखण्याचा मानस असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौ सुपर जायंट्सचा टॉप 4 मध्ये परतण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 10-10 पॉइंट्स आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट सरस असल्याने कारणाने पलटण चौथ्या स्थानी आहे. तर लखनौ सहाव्या क्रमांकावर आहे.
मुंबई आणि लखनौ दोन्ही संघांनी या हंगामात प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत. तर 4 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तसेच दोन्ही या मोसमात 4 एप्रिलनंतर पुन्हा आमनेसामने असणार आहेत. लखनौने तेव्हा मुंबईला पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबई या पराभवाचा वचपा घेण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा आहे. पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सचा प्रयत्न विजयासह नेट रनरेट सुधारण्याकडे असणार आहे. कारण प्लेऑफच्या रस्सीखेचमध्ये नेट रनरेट निर्णायक ठरतो.
कर्णधार ऋषभ पंत आऊट ऑफ फॉर्म असल्याने लखनौ सुपर जायंट्सची डोकेदुखी वाढली आहे. पंतला या मोसमात आतापर्यंत त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पंतने आयपीएल 2025 मधील एकूण 9 सामन्यांमध्ये फक्त 106 धावा केल्या आहेत. त्यामुळे पंतचा मुंबईच्या गोलंदाजासंमोर चांगलाच कस लागणार आहे.
मुंबई विरुद्ध लखनौ सामना रविवारी 27 एप्रिलला होणार आहे.
मुंबई विरुद्ध लखनौ सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध लखनौ सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.
मुंबई विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
मुंबईला या हंगामातही अपेक्षित सुरुवात करता आली नाही. मात्र मुंबईने निर्णायक क्षणी गियर बदलला आणि स्वत:ला प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवलं आहे. मुंबईला पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात मुंबईने विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर पुन्हा सलग 2 सामने गमावले. मात्र पलटणने तिथून मागे वळू पाहिलं नाही. मुंबईने सलग 4 सामने जिंकले. त्यामुळे आता पलटणचा घरच्या मैदानात जिंकून विजयाचा पंजा उघडण्याचा मानस असणार आहे.