आयपीएल २०२५ स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी प्रतिभा दाखवली आहे. यामध्ये १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे.
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू आहे.
इतकेच नाही, तर त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतकही ठोकले. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय खेळाडू ठरला.
तो वरिष्ठ टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणाराही खेळाडू आहे.
त्यामुळे त्याचे क्रिकेटवर्तुळातून जोरदार कौतुक झाले. आता त्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.
बिहारमधील खेलो इंडिया युथ गेम्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मोदी यांनी म्हटले की 'मी आयपीएल पाहिलं, त्यात बिहारचा मुलगा वैभव सूर्यवंशीची अविश्वसनीय कामगिरीही पाहिली.'
त्यांनी पुढे म्हटले, 'इतक्या कमी वयात वैभवने मोठे विक्रम केले. त्याच्या या कामगिरीमागे खूप मेहनत होती. त्याची प्रतिभा पुढे येण्यासाठी त्याने विविध स्थरावर अनेक सामने खेळले. जेवढे तुम्ही जास्त सामने खेळाल, तेवढे चमकाल. स्पर्धांमध्ये खेळणे खूप महत्त्वाचे असते.'