Omar Abdullah :पडलेल्या घरांची पुन्हा बांधणी करू; उमर अब्दुल्ला यांची ग्वाही, सीमाभागातील गावांना भेट
esakal May 15, 2025 01:45 PM

श्रीनगर : नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे पडलेल्या घरांची पुन्हा बांधणी करू आणि शक्य तेवढी नागरिकांना मदत केली जाईल, अशी हमी बुधवारी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिली. माझ्या लोकांचे दुःख खूप वैयक्तिक आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानच्या गोळीबाराने आणि तोफांच्या माऱ्याने बाधित झालेल्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीसह सलामाबाद, लागमा, बांदी आणि गिंगल या भागांना भेट देऊन अब्दुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात वैयक्तिक बंकर बांधण्याची मागणी केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुमची घरे पुन्हा बांधण्यासाठी सरकारकडून तुम्हाला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. उरीच्या लोकांनी अनेक वेळा वेदना सहन केल्या आहेत, पण प्रत्येक वेळी ते धैर्याने उभे राहिले आहेत, असे अब्दुल्ला म्हणाले. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सल्लागार नासीर अस्लम वणी, उरीचे आमदार सज्जाद उरी आणि जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

सर्वांना भरपाई देणार

उरीत पत्रकारांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, पाकिस्तानने नागरी भागात दोन-तीन दिवस अतिशय क्रूरपणे गोळीबार केला. जास्तीतजास्त सर्वसामान्य नागरिकांची हानी व्हावी म्हणूनच सीमेपलीकडून जाणीवपूर्वक गोळीबार होत होता. आता शस्त्रसंधी झाला आहे. दोन दिवसांपासून ‘एलओसी’वर लोक शांत आहेत. ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व घरांपर्यंत पोहण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकसानीची पाहणी करून भरपाई देणार आहोत. याचे काम सुरू झाले असून त्यासाठी काही दिवस लागतील. पण आम्ही लोकांना परत उभे करू.

भविष्यात अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी काय तयारी केली आहे, असे विचारल्यावर अब्दुल्ला म्हणाले की, गोळीबार झालेल्या भागांमध्ये वैयक्तिक बंकर बांधण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे.जिथे जिथे मी गेलो, जम्मू असो की काश्मीर, प्रत्येक ठिकाणी जास्त बंकरची मागणी करण्यात आली. परिस्थिती कधीही बिघडू शकते, त्यामुळे लोकांना वैयक्तिक बंकरची गरज भासत आहे. प्रथम आम्ही बाधित नागरिकांना तत्काळ मदत पुरवू आणि त्यानंतर गोळीबार झालेल्या सर्व भागांसाठी बंकरांच्या मागणीचा विषय केंद्र सरकारकडे मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले.

कसला फायदा?

सीमापार झालेल्या गोळीबारातून कुणाला फायदा झाला का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘कसला फायदा? हा प्रश्न त्यांच्याकडे विचारावा, ज्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की हा संघर्ष आम्ही सुरू केलेला नाही. पहलगाममधील हल्ल्यांत आमचे २६ निष्पाप जीव गेले आहेत. जर तिकडून बंदुका शांत झाल्या, तर या बाजूच्या बंदुका आपोआप शांत होतील, हे मी आधी सांगितले होते. सुदैवाने तिकडच्या ‘डीजीएमों’नी संपर्क साधल्यानंतर शस्त्रसंधी शक्य झाला. त्यामुळे सध्या सीमेवर आणि नियंत्रणरेषेवर शांतता आहे.’’

सलामाबाद, लगामा, बांदी आणि गिंगल या गोळीबार झालेल्या भागांना भेट दिली. २००५ च्या भूकंपापासून ते सीमापार गोळीबाराच्या वेदनापर्यंत या भूमीने खूप काही सहन केले आहे. तरीही येथील लोक धैर्याने आणि अपार जिद्दीने प्रत्येक वेळी उभे राहतात.

- उमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.