मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते, आमदार छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार, 20 मे) अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यावर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ज्यानंतर हे खाते अद्यापही रिक्त आहे. त्यामुळे भुजबळांकडे पुन्हा याच खात्याचा कारभार सोपविला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. कारण याआधी महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे हेच खाते होते. ज्यामुळे पुन्हा त्यांना हेच खाते मिळण्याची शक्यता आहे. पण भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही नेत्यांबाबत मोठा दावा केला आहे. (Laxman Hake On Chhagan Bhujbal after he took oath as a minister)
राष्ट्रवादीचेन नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधकांनी आणि विशेषतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांना मंत्रिपद मिळताच जोरदार टीका केली आहे. पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी “यह तो झाँकी है…” असे म्हणत मोठा इशारा दिला आहे. कारण, पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार यांचा मंत्रिमंडळात आणि सुप्रिया सुळे यांचा केंद्रामध्ये समावेश काही दिवसात महाराष्ट्राला पाहायला मिळेल, या सर्वांना सदिच्छा…, असा दावा हाकेंकडून करण्यात आला आहे. हाकेंनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकारणात खरंच असे काही घडणार आहे का? याबाबतही जोरदार चर्चा रंगली आहे.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर भुजबळांचा पत्ता कट झाला होता. त्यानंतर भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केले होते. मात्र, त्यांनी अजित पवारांची साथ सोडली नव्हती. त्यामुळे आता भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. पण यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेला दावा खरंच होणार आहे का? याकडेही संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.