वॉशिंग्टन : ‘पाकिस्तान हा भारताकडे अस्तित्वासाठी धोका म्हणून पाहतो, तर भारत चीनला प्रमुख शत्रू मानतो आणि पाकिस्तानकडे सुरक्षा व्यवस्थेपुढील प्रमुख धोका म्हणून पाहतो,’ अशी निरीक्षणे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या जागतिक अहवालामध्ये नोंदविण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षण प्राधान्यक्रमामध्ये जागतिक स्तरावरील नेतृत्व म्हणून प्रतिमा विस्तार करणे, चीनला रोखणे आणि भारताच्या सैन्यदलांची शक्ती वाढविणे यावर येत्या काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षानंतर सुरक्षा व्यवस्थेला हानी पोहोचवणारे राष्ट्र म्हणून भारत पाकिस्तानकडे पाहतो, तर चीनकडे प्राथमिक प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘जम्मू-काश्मीरमध्ये एप्रिलच्या शेवटी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ७ ते १० मे दरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये ड्रोन, मिसाइल आदींच्या माध्यमातून संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केला. भारत हा चीनच्या प्रभावाला प्रतिबंध करण्यासाठी आणि जागतिक नेतृत्वाची भूमिका सुदृढ करण्यासाठी हिंदी महासागर प्रदेशातील द्विपक्षीय संरक्षण भागीदारीला प्राधान्य देत आहे. भारत-चीन यांच्यातील संघर्षानंतर झालेल्या सैन्यमाघारीनंतरही दोन्ही देशांमधील सीमाप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांविरोधात कोणती भूमिका घेतात, त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत,’ असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारत-रशिया संबंधांवर भाष्यअमेरिकेच्या अहवालात भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख करण्यात आला असून, भारतासासाठी रशियासोबतचे द्विपक्षीय संबंध आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. मोदी सरकारच्या काळात भारताने रशियाकडून सैन्यविषयक उपकरणांची खरेदी कमी केली आहे; परंतु भारत अजूनही संरक्षण उत्पादनांसाठी रशियन सुट्या भागांवर अवलंबून आहे. भारताच्या लष्करात रशियन बनावटीचे रणगाडे, हवाई संरक्षण प्रणाली, लढाऊ विमाने यांचा भरणा आहे. चीन आणि पाकिस्तानविरुद्ध संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी तो अधिक महत्त्वाचा आहे, असेही हा अहवाल म्हणतो.
अहवाल काय म्हणतो?भारताकडून संरक्षण उत्पादनांसाठी देशांतर्गत व्यवस्थेची उभारणी
लष्कराच्या आधुनिकरणाची प्रक्रिया २०२४ पासून सुरू
अण्वस्त्रवाहू पाणबुडीद्वारे भारताने नौदलाचीही ताकद वाढविली
संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढणार
सीमेपलीकडून निर्माण होणारी विविध आव्हाने, तेहरिके तालिबान पाकिस्तान, बलुचिस्तानातील विविध गट अशी अनेक आव्हाने पाकिस्तानसमोर असल्याचे हा अहवाल सांगतो. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात २०२४ मध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचा बळी घेतला. पाकिस्तान भारताकडे अस्तित्वाला धोका म्हणून पाहतो. पारंपरिक सैन्यासोबत अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरूच राहतील, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.