भावनिक बुद्धिमत्ता
esakal May 29, 2025 11:45 AM

- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार

मैत्रिणींनो, आपण सर्व स्त्रिया नैसर्गिकता जरा जास्त भावनिक असतो. भावना सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत; पण स्त्रियांच्या आयुष्यामध्ये त्या अधिक खोलवर प्रभाव टाकतात. भावनांचा परिणाम अगदी आपल्या शरीररचनेपासून, सामाजिक भूमिकांपर्यंत प्रत्येक घटनेवर परिणाम करत असतो. त्यामुळे भावनांना योग्य प्रकारे समजून घेणं आणि त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं तुम्हा आम्हा स्त्रियांच्यासाठी अधिक महत्त्वाचं ठरतं.

आपण स्त्रिया अनेक भूमिका बजावत असतो. या भूमिका बजावत असताना भावनिक समतोल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. योग्य वेळी भावना समजून घेणं, स्वतःच्याच नाही तर इतरांच्याही भावनांची जाणीव ठेवणं, हे नात्याच्या यशासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. भावना योग्यरित्या हाताळल्या गेल्या, तर त्या आत्मविश्वास, सहानुभूती आणि समंजसपणा वाढवतात. म्हणूनच भावनिक समज म्हणजेच ‘इमोशनल इंटेलिजन्स’ हे महिलांचं एक अदृश्य बळ आहे जे त्यांच्या प्रत्येक निर्णयात आणि नात्यात सकारात्मक बदल घडवू शकतं.

भावनिक समज नसल्यामुळे समस्या

  • कुटुंबात सततचे वाद, भांडणं

  • मुलं, नवरा, सासू-सासरे, आई-वडील या जवळच्या नातेसंबंधांमध्ये तणाव

  • मित्र-मैत्रिणी, शेजारीपाजारी या नात्यांमध्ये कटुता

  • कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी अडचणी

  • स्वतःचं सतत दुखावलं जाणं किंवा रागावणं

भावनिक समज अथवा बुद्धिमत्ता हे स्त्रियांसाठी एक जीवनकौशल्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण एक स्त्री फक्त घर सांभाळत नसते, तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या भावनिक गरजाही सांभाळणं एका स्त्रीची जबाबदारी असते. कारण एक स्त्री फक्त घर सांभाळत नसते, तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या भावनिक गरजाही सांभाळणं एका स्त्रीची जबाबदारी असते.

मैत्रिणींनो, घर चालवणं ही केवळ कामांची यादी नाही, तर माणसांची देखभाल आहे. पतीचा तणाव, मुलांची चिडचिड, वृद्धांचे विचार, आणि स्वतःचे भाव - हे सगळं समजून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी भावनिक समजूतदारपणा आवश्यक असतो. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे फक्त रडणं किंवा भावना व्यक्त करणे नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून समजून घेणं आणि त्याला योग्य प्रतिसाद देणं, हे एक कौशल्य आहे आणि हे कौशल्य सरावानं विकसित करता येतं.

भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या स्त्रियांची काही लक्षणं -

  • स्वतःच्या भावना ओळखता येणं.

  • इतरांच्या भावना समजून घेणं.

  • वादविवाद, भांडणाऐवजी संवाद शांतपणे आणि समजूतदारपणे करणं.

  • तणावाच्या वेळी समतोल.

  • गोंधळातही शांत राहणं आणि इतरांना आधार देणं.

  • जुन्या गोष्टी मनात न ठेवता स्वतःला आणि इतरांना माफ करण्याची ताकद.

भावनिक बुद्धिमत्तेसाठी टिप्स

1) आत्मनिरीक्षणाची सवय लावा : रोज थोडा वेळ तरी स्वतःशी संवाद साधा. आपला दिवस कसा गेला, काय चांगलं वाटलं, काय आवडलं नाही, याचं आत्मनिरीक्षण करा.

2) दुसऱ्याच्या नजरेतून गोष्टी बघायला शिका : कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त स्वतःच्या बाजूनं विचार न करता स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा.

3) संवादामध्ये सकारात्मकता : ‘तू माझं कधीच ऐकत नाही’ याऐवजी ‘आपण दोघं थोडं शांतपणे बसून बोलू या का?’ अशा सकारात्मक प्रकारे संवाद साधायला शिका.

4) स्वतःच्या भावनांकडे लक्ष द्या : कुठल्याही भावनेला नाकारू नका. सर्व भावना नैसर्गिक आहेत; परंतु त्या कशा व्यक्त करतो हे महत्त्वाचं असतं.

मैत्रिणींनो, आजच्या बदलत्या जगात शिक्षण, कौशल्य, तांत्रिक ज्ञान यांचं महत्त्व वाढत चाललंय; परंतु भावनिक बुद्धिमत्ता किंवा समज याच्याकडे बरेचदा दुर्लक्ष केलं जातं. भावनिक बुद्धिमत्ता हे केवळ कौशल्य नाही, तर ती घर चालवण्याची शांत आणि प्रभावी पद्धत आहे. घराची खरी शांती, प्रेम आणि एकजूट ही त्या स्त्रीच्या भावनिक समजूतदारपणावर उभी असते, त्यामुळे बुद्धिमत्ता किंवा समज वाढवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.