भोंदू बाबाकडून लाखोंची फसवणूक
esakal May 30, 2025 01:45 AM

कर्जतमध्ये नागरिकांकडून खड्ड्यांवर मलमपट्टी
कर्जत, ता. २९ (बातमीदार) ः कर्जत शहरातील आमराई रस्त्यावर मोठा प्रमाणात खड्डे पडले आहेत, मात्र तक्रार करूनदेखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर नागरिकांकडून खड्डे भरले जात आहेत. येथील स्थानिक तरुण वाहिद याने हा स्तुत्य उपक्रम सुरू केल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
शहरातील महत्त्वाच्या मार्गासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिकांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून ये-जा करणे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत होते. कर्जत नगर परिषदेचे कोटी रुपयांचे बजेट असतानाही, मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नगर अभियंत्यांनी या समस्येकडे अजूनही गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आता स्वतः पुढे येत रस्त्यांची देखभाल करताना दिसून येत आहेत. नुकतेच येथील तरुण वाहिद याने स्वतः रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या तरुणाच्या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरात त्याचे कौतुक होत आहे, मात्र स्थानिक प्रशासनाची उदासीनता दिसून येत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
.........
श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत पाणी उकळून पिण्याचे आवाहन
पावसामुळे धरणातील पाण्यात गाळ; प्रशासनाकडून उपाययोजना सुरू
श्रीवर्धन, ता. २९ (वार्ताहर) ः मागील काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर धरणामध्ये डोंगरकपारीतून गाळ वाहून आला आहे. त्यामुळे पाणी गढूळ झाले असून, श्रीवर्धन नगर परिषदेच्या जॅकवेलमध्ये तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पात गाळ साचला आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत, मात्र तोपर्यंत पुढील काही दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून तसेच गाळून पिण्याचे आवाहन श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
श्रीवर्धन शहरास रानवली येथील लघुपाटबंधारे विभाग, कोलाड यांच्या अखत्यारीत असलेल्या पाझर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या बाजूला श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पातून शहरास शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यःस्थितीत धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला असून, गेले तीन ते चार दिवस पडलेल्या अवकाळी व अतिमुसळधार पावसामुळे धरणाच्या भोवताली असलेल्या लाल मातीच्या डोंगरावरून सर्व मातीचा गाळ वाहून श्रीवर्धन नगर परिषदेच्या जॅकवेलमध्ये तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पात आलेला आहे. श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या स्वच्छतेचे काम निरंतर सुरू आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेमार्फत पाण्यामध्ये देण्यात येणाऱ्या ॲलम, क्लोरीन इत्यादी औषधांची मात्रादेखील वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शहरास गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी उकळून तसेच गाळून पिण्याचे आवाहन श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
..........
कर्जतमधील नाले बनताहेत डम्पिंग गाउंड
टेम्पो भरून कचरा टाकणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल
कर्जत, ता. २९ (बातमीदार) ः कर्जत नगर परिषद हद्दीतील मालवाडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये टेम्पो भरून कचरा टाकणाऱ्या इसमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. संबंधित इसम सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या नियमांचा सर्रास उल्लंघन करत असून, नगरपालिकेच्या अधिकृत डम्पिंग ग्राउंड किंवा कचरा संकलनासाठी असलेल्या वाहनांचा वापर न करता, थेट नाल्यामध्ये कचरा टाकत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कर्जतमध्ये सध्या कचऱ्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. नागरिक कोठेही कचरा आणून टाकत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर बोट ठेवले जात आहे. नुकतेच कर्जत नगर परिषद हद्दीतील मालवाडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यामध्ये टेम्पो भरून कचरा टाकणाऱ्या इसमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात गंभीर दुर्गंधी पसरत असून, स्थानिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याशिवाय नाल्यामध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा कचरा नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करून जलनिष्कासनात अडथळा आणू शकतो, ज्यामुळे परिसरात पूरस्थिती उद्भवू शकते. या प्रकारावर नगर परिषद आणि पोलिस प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार, हे सध्या नागरिकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरात वाढणाऱ्या अस्वच्छतेमुळे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, तसेच दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
......
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
माणगाव (बातमीदार) ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत, संघ शिक्षा वर्ग (सामान्य) यांच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध प्रशिक्षणात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंसेवकांना ऐतिहासिक साधनांची माहिती व्हावी, तसेच शिवकालीन शस्त्रे प्रत्यक्ष पाहता यावीत, यासाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. १६ ते १ जून या कालावधीत विजया गोपाल गांधी वनवासी कल्याण आश्रमशाळेत ही कार्यशाळा सुरू राहणार आहे. दत्ताराम गंगाराम सोलकर यांच्या हस्ते या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या शस्त्र प्रदर्शनात ढाल, तलवार, धनुष्यबाण, शिरस्त्राने, चिलखत, जिरेटोप, वाघनखे, गुप्ती, बरची, भाला, दांडपट्टा इत्यादी शस्त्रांचे प्रदर्शन व माहिती देण्यात आली आहे. शस्त्र संग्राहक अभयराजे जगताप यांनी ही शस्त्र प्रदर्शनी संग्रहित केली असून, त्यांच्या सहयोगातून हे शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या संघ शिक्षा वर्गाचा प्रकट समारोप शनिवार ३१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जयंत गांधी मेमोरियल हॉल माणगाव येथे होणार आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी नागरिकांनी या शस्त्र प्रदर्शनास भेट द्यावी. तसेच प्रकट समारोहास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...............
निजामपूरमध्ये गवळी समाज भवन उद्घाटन सोहळा
माणगाव (बातमीदार) ः निजामपूर शहरात श्रीकृष्ण यादव गवळी समाज निजामपूर विभाग संस्थेच्या गवळी भवनचे उद्घाटन ३० मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता रायगड लोकसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात सकाळी होमहवन, सत्यनारायण महापूजा, साडेअकरा वाजता उद्घाटन सोहळा सर्व मान्यवर, देणगीदार, हितचिंतक व समाजबांधव यांचा सत्कार समारंभ, दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व स्नेहभोजन अशी रूपरेषा असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष निजामपूर विभाग गवळी समाज अध्यक्ष मारुती कासार (गुरुजी) हे भूषविणार आहेत. तर मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, माजी आमदार अनिकेत तटकरे, अजय बिरवटकर, आमदार प्रकाश सुर्वे, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, सरपंच राजाभाऊ रणपिसे, चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला माणगाव तालुक्यातील सर्व समाज बांधव, देणगीदार व हितचिंतक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन निजामपूर विभाग गवळी समाज उपाध्यक्ष घनश्याम तटकरे, सरचिटणीस किरण पागार, खजिनदार गणपत महाडिक, सहसचिव अनिल दर्गे, उपखजिनदार वासुदेव गायकर, विश्वस्त जनार्दन तटकरे, विश्वस्त दिलीप दिघे, विश्वस्त गणेश दिवेकर व सर्व सभासद आणि गवळी समाज बांधवांकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.