रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सवर धमाकेदार विजय मिळवत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम फेरीत रुबाबात धडक दिली. आरसीबीची फायनलमध्ये पोहचण्याची ही एकूण चौथी तर 2016 नंतरची पहिली वेळ ठरली. पंजाब किंग्सने आरसीबीसमोर 102 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 10 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आरसीबीने 2 विकेट्स गमावून 106 रन्स केल्या. आरसीबीचा हा या मोसमातील घराबाहेरील आठवा विजय ठरला. आरसीबीच्या या विजयासह अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इतिहास घडवला आहे. विराटने महारेकॉर्डची बरोबरी केली आहे.
विराटने पंजाब विरुद्ध 100 च्या स्ट्राईक रेटने 12 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. विराटने या खेळीत 2 चौकार लगावले. विराटने यासह माजी फलंदाज शिखर धवन याच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक चौकार लगावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
शिखर धवन याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 222 सामन्यांमध्ये 6 हजार 769 धावा केल्या. धवनने या खेळीत 152 षटकार आणि 768 चौकार लगावले. तर विराटने 266 सामन्यांमध्ये 768 चौकार पूर्ण केले. विराट यासह सर्वाधिक चौकार लगावणारा संयुक्तरित्या दुसरा तर पहिला सक्रीय फलंदाज ठरला.
दरम्यान आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रजत पाटीदारचा हाच निर्णय निर्णायक ठरला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना झटपट गुंडाळलं. आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबच्या एकालाही मोठी खेळी करता आली नाही. पंजाबला जमेतेम 14.1 ओव्हरमध्ये जेमतेम 101 रन्स करता आल्या. त्यानंतर आरसीबीकडून 102 धावांचं आव्हान हे चौघांनीच पूर्ण केलं. विराटच्या 12 धावांचा अपवाद वगळता रजत पाटीदार, मयंक अग्रवाल आणि फिलीप सॉल्ट या तिघांनी विजयात योगदान दिलं.
मयंक अग्रवाल याने 13 बॉलमध्ये 19 रन्स केल्या. तर रजत पाटीदार याने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15 धावा केल्या. तर फिलीप सॉल्ट हा आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. फिलीपने 27 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 56 रन्स केल्या आणि आरसीबीला चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचवलं.
दरम्यान पंजाबला या पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. पंजाब साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी राहिली. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघाला अंतिम फेरीत मिळते. त्यानुसार आता पंजाब एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीम विरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये खेळणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आरसीबी विरुद्ध 2 हात करेल. त्यामुळे आता पंजाब दुसऱ्या संधीचं सोनं करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.