इरावती कर्वे: विठ्ठलाला 'बॉयफ्रेंड' म्हणारी संशोधिका, ज्यांना 'गोधडी'त दिसलं भारतीय समाजाचं रुप
BBC Marathi May 30, 2025 04:45 AM
Urmilla Deshpande

(मे महिना हा महाराष्ट्र स्थापनेचा महिना आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील नायिका या मालिकेतून महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचा परिचय करुन देण्यात येत आहे.)

आपल्या सोयीसाठी केस कापणारी, स्कूटरवरुन महाविद्यालयात जाणारी, प्रेमविवाह करुन मंगळसूत्र, कुंकू, बांगड्यांना तिलांजली देणारी, माणसाच्या कवटीचा अभ्यास करुन नवे सिद्धांत मांडणारी एक मराठी बाई.

समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, संस्कृतीअभ्यासक, बुद्धीप्रामाण्यवादी, विचारवंत, लेखिका अशी अगदीच थोडी-थोडकी ओळख असलेली विदूषी म्हणजे इरावती कर्वे होय.

ज्या काळात त्या जन्माला आल्या आणि त्यांनी आपली कारकिर्द गाजवली ते पाहता, त्या सर्वार्थाने महाराष्ट्राच्या नायिका ठरतात.

त्यांच्याविषयी वर्णन करताना लेखक प्रभाकर उर्फ भाऊ पाध्ये यांनी म्हटलं आहे की, "सर्व भारतीय सांस्कृतिक श्रद्धांच्या त्या वारसदार होत्या, पण त्यांच्या श्रद्धा आधुनिक ज्ञानाच्या आणि विशेषत: त्यांच्या शिस्तीच्या भट्टीत शुद्ध होऊन गेलेल्या होत्या.

मग पंढरीच्या विठोबाचे वर्णन 'माझा बॉयफ्रेंड' म्हणून व्हायचं. आपल्या संस्कृतीकडे इतकं ओलाव्यानं, आपुलकीनं पण त्याचबरोबर संस्कारित आधुनिक दृष्टीनं पाहून त्याचं नवनीत आत्मसात करणारी अशी व्यक्ती पाहिलेलं आता तरी आठवत नाही."

इरावतींनी जसे संशोधनपर ग्रंथ लिहिले, तसे ललित निबंधही लिहिले. त्यांचे जवळजवळ शंभरभर संशोधन लेख आहेत. 'परिपूर्ती', 'भोवरा', 'गंगाजळ' आणि 'युगान्त' ही त्यांची काही ललित पुस्तके प्रचंड गाजली.

याशिवाय, 'मराठी लोकांची संस्कृति, 'आमची संस्कृती', 'संस्कृती', 'हिंदूंची समाजरचना', 'हिंदू समाज: एक अन्वयार्थ', 'महाराष्ट्र: एक अभ्यास', 'किनशीप ऑरगनायझेशन इन इंडिया' हे त्यांचे ग्रंथ त्यांच्या व्यासंगाचा पट उलगडण्यास पुरेसे ठरतात.

त्यांनी महाभारत, रामायण, संतसाहित्य, वेदवाङ्मयय, भारतीय भाषा अशा बहुविध विषयांवर लिखाण केलेलं आहे.

Urmilla Deshpande पती दिनकर कर्वे यांच्यासमवेत इरावती कर्वे

इरावतींचा जन्म ब्रह्मदेशातील रंगूनमध्ये 15 डिसेंबर 1905 रोजी झाला. त्यांचे वडिल ब्रह्मदेशात ब्रिटिश ऑईल कंपनीत नोकरीस होते. वयाच्या सातव्या वर्षी पुण्यात परतलेल्या इरावतींचं शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झालं.

मात्र, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील त्यांचा बराचसा काळ हा फर्ग्यूसनचे तेव्हाचे प्रिन्सिपल रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांच्याकडे गेला.

त्या त्यांच्याच घरी रहायच्या. इरावतींसाठी रँग्लर परांजपे हे वडिलांसारखेच होते. त्यांच्यामुळेच, इरावतींना समाजशास्त्रात रस निर्माण झाला आणि पुढे जाऊन त्यांनी या सामाजिक विज्ञानात मूलभूत कार्य केलं.

रँग्लर परांजपे पुरोगामी, आधुनिक आणि निरिश्वरवादी विचारांचे होते. त्यांच्याकडून इरावती यांना सगळी पारंपरिक बंधनं झुगारून सुधारणावादी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाली. परांजपेंच्या घरात वाढताना इरावतींवरही तसेच संस्कार झाले.

त्यामुळेच, पत्रिकेत वैधव्ययोग सांगितलेला असतानाही त्यांनी दिनकर कर्वे यांच्यासोबत प्रेमविवाह केला. ज्योतिष आणि पत्रिका पाहणे या दोन्ही गोष्टींवर त्यांचा अविश्वास होता, हेच यावरुन दिसून येतं.

खरं तर या लग्नाला त्यांच्या वडिलांचा विरोध होता. पण आईचा पाठिंबा आणि स्वतंत्र बाणा या वृत्तीमुळे त्यांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला.

दिनकर कर्वे म्हणजेच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे दुसरे सुपुत्र. दिनकर कर्वे यांच्या सोबतीमुळेच इरावतींना आपला अभ्यास आणि संशोधन अधिक निश्चिंतपणे पुढे नेता आलं.

"मला दिनूचे डोक्यावर मोठे छत्र आहे," असं त्या आपल्या सहकाऱ्यांजवळ म्हणत.

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर इरावतींनी जेव्हा जर्मतीत जाऊन मानववंशशास्त्रात डॉक्टरेट करायची ठरवलं तेव्हा त्यांना घरून बराच विरोध झाला.

खास करून तिचे वडिल या निर्णयाच्या ठाम विरोधात होते. मात्र, रँग्लर परांजपे आणि दिनकरराव यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच त्या जर्मनी गाठू शकल्या.

जर्मनीमध्ये ज्या नावाजलेल्या प्राध्यापकांच्या हाताखाली त्या पीएचडी करायला गेल्या होत्या, त्यांचाच वर्णश्रेष्ठत्वाला बळकटी देणारा सिद्धांत खोडण्याचं धाडस इरावतींनी दाखवलं होतं.

'इरू : द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे' हे त्यांच्या आयुष्यावरील चरित्रात्मक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं असून उर्मिला देशपांडे आणि थिआगो पिंटो बार्बोसा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात हा रंजक किस्सा नोंदवण्यात आला आहे.

हिटरलचा उदय व्हायच्या आधी म्हणजेच 1927 साली दीर्घपल्ल्याचा जहाजप्रवास करुन त्या जर्मनीला पोहोचल्या. त्याकाळी मानववंशशास्त्रील अतिशय नावाजलेले वैज्ञानिक युगेन फिशर यांच्याकडे त्या पीएचडी करत होत्या. या फिशर यांनी 'युगेनिक्स' हा वर्णवर्चस्ववादाचा सिद्धांत मांडला होता.

इतरांच्या तुलनेत श्वेतवर्णीय युरोपियन वंशाच्या लोकांचा मेंदू असममित (asymmetrical) आहे. गोऱ्या युरोपियन लोकांच्या मेंदूचा उजवा भाग हा डाव्या भागापेक्षा आकाराने जास्त मोठा आहे.

मेंदूचा उजवा भाग हा तर्कशील विचार करण्यासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे श्वेतवर्णीय युरोपियन वंशाचे लोक जन्मजातच इतरांपेक्षा अधिक तर्कशील, हुशार पर्यायाने श्रेष्ठ असतात, असा हा सिद्धांत होता.

इरावतींनी स्वतः संशोधन करून याची पडताळणी केली आणि फिशर यांचा दावा खोडून काढला.

मेंदूचा उजवा भाग डाव्या भागापेक्षा मोठा असणं, याचा व्यक्तीच्या बुद्धीमत्तेशी काडीमात्र संबंध नाही, हे इरावतींनी आपल्या संशोधनातून सप्रमाण सिद्ध केलं.

या क्रांतिकारी संशोधनातील पुरावे इरावतींनी सादर केले तेव्हा एकच खळबळ उडाली होती.

आजतागायत युगेनिक्स नावाच्या या छद्मविज्ञानाच्या जोरावर वंशाधारित भेदभावाला न्याय्य ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता, तोच मुळात अवैज्ञानिक असल्याचं इरावतींनी आता सिद्ध करून दाखवलं होतं.

Speaking Tiger Publishing Pvt. Ltd. इरू : द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे या पुस्तकाचे मुखपृष्ठ

संशोधन आणि ललित लेखन या दोन्ही क्षेत्रात इरावतींनी आपल्या प्रतिभेने आणि अत्यंत अभ्यासाने मुशाफिरी केली.

दोन्ही गोष्टींत त्यांना तितकाच रस होता आणि दोन्हींनाही त्या चांगला न्याय देऊ शकल्या. बुद्धीनिष्ठ आणि भावनिष्ठ असं दोन्ही प्रकारचं लिखाण हे इरावती कर्वेंचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

त्यांच्याविषयी विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी म्हटलंय की, "इरावतीबाईंचे मन त्यांच्या विशिष्ट जीवनक्रमामुळे तीन पातळ्यांवर वावरणारे होते. मनाने सुसंस्कृत असणाऱ्या आणि जीवनात रस घेणाऱ्या या विदुषीला आपण स्त्री आहोत, गृहिणी आहोत याचीही उपजत जाणीव होती.

मातृत्वात आपल्या जीवनाची परिपूर्ती आहे याचीही उपजत जाणीव होती. म्हणून त्या घरात, संसारात आपल्या प्रिय पतीत, मुलाबाळांत मनाने समरस झालेल्या आणि रमलेल्या होत्या. समरसता हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक उपजत धर्म होता."

इरावतीबाईंना विठोबाचं वेड होतं, असं म्हटलं तरी वावगं ठरु नये.

त्या बुद्धीप्रामाण्यावादी असल्या तरीही विठ्ठलाविषयी त्यांना विलक्षण आकर्षण होतं. कदाचित लोकसंस्कृतिच्या अभ्यासक असल्यामुळे वारी आणि विठ्ठलाविषयी त्यांना ओढ होती.

1949 साली त्यांनी विठोबा आणि वारीवर 'वाटचाल' हा लेख लिहिला होता. स्वत: पंढरीच्या वारीला गेल्यानंतरचे अनुभववर्णन या लेखात आहे. त्यानंतर 1970 साली त्यांनी 'बॉयफ्रेंड' हा लेख लिहिला होता. व

विठ्ठल हा सखा, सोबती आणि अगदी आधुनिक परिभाषेत बोलायचं झालं तर 'बॉयफ्रेंड'च नाही का, असं काहीसं त्यांना वाटूनच त्यांनी तो लेख लिहिला असावा.

त्यांच्या या विठ्ठलवेडाविषयी स्वत: पु. ल. देशपांडे यांनी लिहिलंय की, "'परिपूर्ति'मुळे सगळ्यांच्या डोळ्यांत भरलेली इरावतीबाई ही महाराष्ट्रातील सर्वार्थाने 'सर्वांत उंच' बाई झाली ती 'अभिरुचि'त आलेल्या त्यांच्या 'वारी'मुळे.

एक निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, एकाहून अधिक युरोपीय भाषा जाणणारी; कऱ्हाड-चिपळूण म्हणावे इतक्या सहजतेने लंडन-बर्लिनचा उल्लेख करणारी, शिवाय संस्कृत भाषेतील पंडिता आणि त्याहूनही म्हणजे 'चांगली शिकली सवरलेली ब्राह्मणाची बाई' चक्क पंढरीच्या वारीबरोबर त्या भाबड्या, दीन, अशिक्षित, रंजल्या-गांजल्या मानवी प्रवाहात एक थेंब होऊन मिसळते... हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पंढरीचा अबीर बुक्का वाटावा तसा 'वारी' हा लेख वारीचा प्रसाद म्हणूनच समजला पाहिजे.'"

देशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.

आपल्या संशोधनासाठी इरावती कर्वे यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे, आजही महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या लिखाणाचा समावेश होतो.

भारताचा इतिहास आणि संस्कृती याविषयी इरावती कर्वेंनी करून ठेवलेलं लिखाण अतिशय मूलभूत शिवाय क्रांतीकारी म्हणावं अशा स्वरूपाचं आहे.

मात्र, ज्या योगदानामुळे त्यांचं नाव भारतीय समाजशास्त्रात नोंदवलं गेलं आहे, ते लिखाण प्रामुख्याने जातिव्यवस्थाविषयकच असल्याचं प्रतिपादन लेखक आणि समाजशास्त्राचे अभ्यासक मिलिंद बोकील करतात.

'येथे बहुतांचे हित' या आपल्या पुस्तकातील 'इरावतीबाईंची गोधडी' या लेखात ते म्हणतात की, "भारतीय समाजाला गोधडी म्हणणे हीच इरावतीबाईंची मुख्य देणगी आहे. कारण, इथे जे निरनिराळे गट आहेत त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध हा गोधडीसारखाच आहे.

आपल्या समाजामध्ये निरनिराळे गट असणे हेच त्याचे एकमेव वैशिष्ट्य होते असे नव्हे, तर शेकडो वर्षे या गटांचे सातत्य टिकून राहिलेले आहे, ही गोष्टही महत्त्वाची आहे. 'गोधडी' या सूत्रामुळे या प्रक्रियेवर नेमका प्रकाश पडतो."

मात्र, जातिव्यवस्थेबद्दलचे इरावतींचे योगदान एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, हे अधोरेखित करताना ते म्हणतात की, "इरावतीबाई या भारतीय समाजाचा आणि परंपरेचा घटक असल्याने त्यांची या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी निराळी होती."

शिवाय, "इरावतीबाईंनी जातिव्यवस्थेमागचे हे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे ते त्यांच्या समाजशास्त्रज्ञ या भूमिकेच्या पलीकडे जाऊन सांगितले आहे आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य मानले पाहिजे.

इतर समाजशास्त्रज्ञ यांत्रिक, कोरड्या, शास्त्रीय पद्धतीने समाजाकडे बघत असताना इरावतीबाई मात्र अतिशय सेंद्रिय, जवळजवळ भाविक आणि आत्मीय नजरेने आपल्या समाजाकडे बघत होत्या," असंही ते म्हणतात.

देशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.

1940 ते 1970 हा काळ डोळ्यांसमोर आणला तर एका बाईसाठी संशोधनासाठी ठिकठिकाणी, रात्री-अपरात्री फिरणं किती कठीण असू शकतं, याची कल्पना आपल्याला येऊ शकते.

त्या रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाचा प्रवास करत, जंगलातून पायपीट करत जात, आदिवासी पाड्यांवर जाऊन संवाद साधत, कधी बैलगाडी, कधी ट्रॅक्टर, कधी एस.टी. असा प्रवास करत त्या सर्व प्रकारच्या गैरसोयी सोसत हे संशोधन करत होत्या.

संशोधनासाठी वयाच्या पन्नाशीमध्ये त्या तामिळ भाषा शिकल्या, ही गोष्ट त्यांची अभ्यासाप्रती किती सचोटी होती, हे दाखवून देते.

गुजराथमध्ये उत्खनन चालू असताना उत्खनन मोहिमेतील अनेक लोक अस्पृश्य असल्याने गावकऱ्यांकडून त्यांना जेवण मिळालेले नव्हते. अशावेळी, ओल्या लाकडांवर स्वयंपाक करुन इरावतींनी सर्वांना जेवण करुन घातले, अशी आठवण सांगितली जाते. उषा कोटबागी लिखित 'इरावती कर्वे: व्यक्ती आणि वाङ्मय' या पुस्तकात हा किस्सा नोंदवण्यात आला आहे.

त्यांच्याबद्दलचे असे आणखीही काही किस्से त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अधिक सखोल अधिक ओळख करुन देतात.

'इरू : द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे' या पुस्तकातही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू अशाच एका किस्स्यामधून उलगडताना दिसतो.

इरावती कर्वे जन्मानं चित्पावन ब्राह्मण होत्या. शुद्ध शाकाहाराचं पालन करणं, हे त्यातच आलं. पण आपल्या संशोधनासाठी एका आदिवासी जमातीच्या पाड्यात गेल्यानंतर इरावतींची भेट तिथल्या आदिवासींच्या प्रमुखाशी झाली.

तेव्हा त्या आदिवासी प्रमुखानं इरावतींचा पाहुणचार करताना त्यांना मांस खायला दिलं. इरावतींनी सुद्धा कुठलाही संकोच न बाळगता हे मांस खाल्लं. मांसाहार हा आदिवासींच्या संस्कृती आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असल्याची जाणीव त्यांना होती.

आदिवासींमध्ये राहून त्यांच्या संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यामधीलच एक होऊन जगणं गरजेचं आहे, हे इरावतींनी ओळखलं होतं. त्यामुळे कुठलाही आढेवेढे अथवा नाराजी न दाखवता त्यांनी खुल्या मनानं मांसाहाराचं सेवन केलं. परंपरा आणि धर्माचं ओझं बाळगणं त्यांना कधीच मंजूर नव्हतं, हे दिसून येतं.

म्हणूनच, लेखक मिलिंद बोकील म्हणतात की, "इरावतीबाई एक कर्तबगार पंडिता होत्या. त्यांनी विपुल समाजशास्त्रीय व ललित लेखन केले.

थोडेसे अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर ते असे म्हणता येईल की मराठीच्या अंगावर त्यांनी अनेक भरजरी वस्त्रे चढवली, पण ही 'गोधडी'ची (जातव्यवस्थाविषयक अभ्यासू मांडणी) जी भेट त्यांनी आपल्याला दिली ती त्यांची सर्वोत्तम भेट आहे.

भावी काळात स्वत:च्या भूमीवर ठाण मांडण्यासाठी, एक दणकट वैचारिक अंथरुण म्हणून तर ती आपल्याला उपयोगी पडेलच, पण जागतिकीकरणाच्या थंडीवाऱ्यात एक उबदार, भावनिक पांघरुण म्हणूनही ती कामास येईल."

Urmilla Deshpande

11 ऑगस्ट 1970 रोजी इरावती कर्वे यांचं निधन झालं.

1960 मध्ये बर्क्लेमध्ये इरावती आणि दिनकरराव कर्वे या दोघांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. जर्मनीतील झुरीच विमानतळावर इरावतीबाईंना हृदयविकाराचा पहिला झटका आला. पण, या प्रसंगालाही त्या धीरोदात्तपणे सामोऱ्या गेल्या.

त्या तातडीने मायदेशी परतल्या नाहीत; तर वैद्यकिय मदत घेऊन ठरवल्याप्रमाणे त्या बर्क्लेला गेल्या आणि त्यांनी नियोजित कार्यक्रमही पार पाडला.

इरावतींना त्यांच्या कामामुळे अनेक मान-सन्मान मिळाले. 1947 साली दिल्लीतील सायन्स काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाच्या अध्यक्षा, 1955 मध्ये लंडन विद्यापीठामध्ये मानवशास्त्राच्या व्याख्यात्या तसेच 1955 मध्ये आफ्रिकेत भरलेल्या प्रागितिहासाच्या काँग्रेसमध्ये भारत सरकारचंही त्यांनी प्रतिनिधित्व केलं. इंग्लंडमधील 'एम्सली हॉर्निमन स्कॉलरशीप' मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय संशोधक होत्या.

संशोधनाशिवाय, त्यांच्या 'परिपूर्ति', 'भोवरा', 'युगान्त' अशा ललितलेखनालाही पुरस्कार मिळाले. महाभारतातील व्यक्तिरेखांवर लिहिलेल्या 'युगान्त' पुस्तकाला तर 1972 सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला.

त्यांच्याविषयी लिहिताना पु. लं.नी म्हटलंय की, "महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर फुले, आगरकर आणि कर्वे यांच्या तपश्चर्येला आलेले ते मधुर रसांनी भरलेले रसरसशीत फळ होते.

पण जगातल्या ज्ञानी लोकांना आणि जीवनभक्तांना आपण हेच सांगू की, ज्ञान, विज्ञान कला, सुसंस्कार अशा अनेक दीपांनी उजळलेली इरावती ही अस्सल भारतीय संस्कृतीच्या शिल्पाने घडलेली, गार्गी-मैत्रेयींच्या कुळातील, साक्षात जीवनमंदिरापुढली एक दीपमाळच होती."

संदर्भ :

  • इरावती कर्वे: व्यक्ती आणि वाङ्मय - डॉ. उषा कोटबागी - पद्मगंधा प्रकाशन
  • 'इरू : द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे' - उर्मिला देशपांडे आणि थिआगो पिंटो बार्बोसा - स्पीकिंग टायगर पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड, 2024
  • येथे बहुतांचे हित - मिलींद बोकील - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
  • (बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.