Nagpur News : पेरणीपूर्व मशागतीत अवकाळी पाऊस घालतोय खोळंबा; शेतकरी पावसामुळे हवालदिल, मे महिन्यात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद
esakal May 30, 2025 04:45 AM

द्रुगधामना : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नागपूर ग्रामीण तालुक्यासह परिसरात मागील आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. मे महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले असून, शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत.

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, नागपूर ग्रामीण तालुक्यात मे महिन्यात सरासरी ४०-५० मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यावर्षी आतापर्यंत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दैनंदिन ढगाळ वातावरण, रात्रीच्या वेळेस संततधार आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी मशागत थांबली आहे.

पावसामुळे संपूर्ण शिवारात पाणीच पाणी झाले असून, खरिप हंगामाच्या तयारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नांगरणी, कुळवणी आणि सेंद्रिय खते पसरवण्याचे काम सुरू असताना ते अर्धवट राहिले आहे. काही ठिकाणी शेतकरी पेरणीची घाई करताना दिसत आहेत.

शहरवासींनाही दिलासा आणि चिंता

या पावसामुळे नागपूर शहरातील उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर जाणवत आहे. बाजारपेठांमध्ये नागरिक कमी प्रमाणात ये-जा करत आहेत, तर काही भागात सांडपाणी व वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. मे महिन्यात असा पाऊस होणे दुर्मीळ आहे. २० वर्षांनंतर प्रथमच इतक्या प्रमाणात अवकाळी पावसाची नोंद झाली असून, हवामान विभागाने गुरुवारपर्यंत (ता.२९) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

कृषी विभागाचा इशारा

या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी प्रभाकर मोतीकर यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाचे प्रमाण अजून स्थिर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात करू नये. तसेच, कालबाह्य बियाण्यांची खरेदी टाळावी. खरेदी केलेले बियाणे कोरड्या व थंड ठिकाणी साठवावेत, जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकून राहिल, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. नागपूर तालुक्यातील १५० हून अधिक गावांमध्ये या पावसाचा प्रभाव जाणवला असून, अंदाजे ३५ टक्के शेतजमिनीत मशागतीची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी बी-बियाणे वाहून गेल्याचेही समजते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.