नांदेड : दक्षिण मध्ये रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहणाचे अध्यादेश केंद्र सरकारकडून काढण्यात आलेले आहेत.
यासाठी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांच्या वतीने अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलन करण्यात आले होते. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागातील जवळजवळ सर्वच मार्गांच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. अनेक भागांतील रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले आहे. सिकंदराबाद, विजयवाडा, गुंतकल, हैदराबाद, गुंटूर आणि नांदेड अशा एकूण सहा विभाग असलेल्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख पाच रेल्वेस्थानकांचा समावेश नांदेड विभागात आहे.
नांदेड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून दैनंदिन जवळजवळ ५० प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या आवागमन करत असतात. या विभागातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. परंतु, छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७.२९ किलोमीटरच्या अंतराचे दुहेरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते.
बहुतांश मार्गांचे दुहेरीकरण झाले असल्याने रेल्वे प्रवास सोपा आणि लवकर होतो. परंतु, या १७७ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव भिजत पडल्याने रेल्वे प्रवासाचा कालावधी कायम लांबलेला आहे. या परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणासाठी खा.डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
रेल्वे संघर्ष समितीने केला होता पाठपुरावायासाठी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी आणि रेल्वे संघर्ष समितीसह विविध संघटनांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, आता छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरणसाठी आवश्यक असणारी जमीन अधिग्रहण प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केलेली आहे.