ठाणे : भुमिपुत्र फाऊंडेशन आणि आगरी ग्रंथालय चळवळीच्या वतीने आगरी बोलीभाषेच्या संवर्धन व प्रसारासाठी ‘आगरी शाळा’ या नावाने दोन दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीराचं आयोजन २७ आणि २८ मे २०२५ रोजी टाऊन हॉलमध्ये करण्यात आलं होतं. या शिबिरात ठाणे, पालघर, रायगड व मुंबई परिसरातील आगरी भाषाप्रेमी, अभ्यासक आणि तरुण विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध धवला गायिका चंद्रकला सुतार (दासरी) नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संगिता पाटील यांनी आगरी शास्तर गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा.एल.बी पाटील,प्रा. चंद्रकांत पाटील, रामनाथ म्हात्रे यांनी आगरी भाषेची ओळख, तिची रचना, शब्दवैशिष्ट्ये यावर मनोगत मांडले.
सर्वेश तरे यांनी ‘शिका सोप्पी आगरी’ सत्रात सोपी आगरी व्याकरण,आगरी भाषेची बाराखडी आणि रंजक शिकवण दिली. लोककवी प्रशांत मोरे, प्रा. धनंजय पष्टे, कवी.सुनिल पाटील यांनी बोली टिकवण्याचे उपाय सुचवले त्यातच प्रा.प्रशांत मोरे यांच्या आगरी,अहिराणी गाण्यांनी परिक्षक मंत्रमुग्ध झाले त्यांनी आगरी शालेचे वैशिष्ट असे आहे की तिला भिंतीची चौकट नाही ती कधीही कुठेही भरु शकते.
दुपारी ‘ धवला कार्यशाळा’ आणि ‘सादरीकरण’ या सत्रांत सौ.पुष्पलता भगिरथ ठाणेकर, आनुबाई मधुकर पाटील,हौसाबाई सुतार, चंद्रकला दासरी, संगीता पाटील, रामथान म्हात्रे, दया नाईक यांनी हळदीच्या विधी धवलांचे सर्जनशील सादरीकरण घडवले. शेवटी वृत्तनिवेदिका रिद्धी म्हात्रे, मयुरेश कोटकर, प्रकाश पाटील, डॉ. शोभा पाटील यांच्या सहभागाने ‘आगरी कथा अभिवाचन’ प्रभावी ठरले. दुसऱ्या दिवशीची सुरुवात सुनिल पाटील आणि सर्वेश तरे यांच्या पहिल्या दिवसाच्या पुनरावलोकन सत्राने झाली.
यानंतर ‘आगरी धवला कार्यशाळा – सत्र २’ मध्ये विविध लग्न धवलांचे प्रयोगात्मक सादरीकरण झाले. मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांच्या ‘हसत-खेळत शिकू आगरी’ सत्राला भरभरून प्रतिसाद मिळाला. हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी ‘आगरी साहित्याचे गंमतीदार पैलू’, तर प्रकाश पाटील,रामनाथ म्हात्रे आणि सहभागी कवी यांनी आगरी कविता सादर केल्या.
‘अभिजात अभिजात बोली’ या विषयावर लोककवी अरुण म्हात्रे,श्रीनिवास नार्वेकर यांचे चर्चासत्र झाले ज्यात ‘बोलीभाषा टिकवायच्या असतील तर तिच्या अशा कार्यशाला भरायला हव्यात,असे मत भाषाअभ्यासक,दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांनी व्यक्त केले. या दरम्यान प्रा.एल.बी पाटील यांना आगरी ग्रंथालय चळवळीचा यंदाचा साहित्यरत्न आणि गायक किसन फुलोरे यांना कलारत्न पुरस्काराने भिवंडी लोकसभा खासदार यांच्याकडून गौरविण्यात आले.
सिनेअभिनेता मयुरेश कोटकर यांनी खासदार बाल्यामामा यांना ‘फिरते आगरी ग्रंथालयाची उपलब्धी करावी असे निवेदन दिले तात्काळ बाल्यामामानयांनी त्यांच्या स्वियसहाय्यकाशी बोलणी करुन ‘फिरते आगरी ग्रंथालय ( वाचनालय ) म्हणजे mobile van चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन देत ‘आगरी शाला’ उपक्रमाचे कौतुक केले. शेवटी दया नाईक, किसन फुलोरे,जगदीश पाटील व इतर लोकगायकांच्या सादरीकरणातून ‘आगरातील गीतांचा प्रवास’ मनाला भावून गेला.
शिबिराचा समारोप भुमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी आगरी भाषेस केंद्रीय पातळीवरील कायदेशीर स्थान मिळवुन देऊ त्यासाठीचा पाठपुरावा करु असे सांगत सर्वांचे आभार मानत सांगता केली.
’आगरी शाला’ उपक्रमातून आगरी भाषेचे जतन व नव्या पिढीत तिची ओळख निर्माण करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झाला. आगरी ग्रंथालय चळवळ पुढेही असेच उपक्रम सातत्याने राबवेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. या आगरी शालेत ठामपा चे नगरसेवक महेश साळवी,ठाणे माजी जिल्हापरिषद सभापती विजय पाटील,कडोमापचे माजी नगरसेवक संतोष केणी,काल्हेर गावचे माजी सरपंच श्रीधर पाटील यांची आवर्जुन उपस्थिती होती.