Thane News: दिव्यातील बॅनरमुळे पुन्हा 'ती' चर्चा! ठाकरे बंधूंनी एकत्र यावे म्हणत उबाठा गटाकडून बॅनर बाजी
esakal June 02, 2025 03:45 AM

डोंबिवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत शिवसेना शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. पलावा पुलाच्या प्रश्नाला हात घालत स्थानिक प्रश्नांवर आम्ही एकत्र आल्याचे स्थानिक नेते मंडळी सांगत आहेत.

अशातच आता वरिष्ठांनी देखील एकत्र यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे एकत्र हवेत अशा आशयाचे बॅनर दिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून झळकवण्यात आले आहेत. हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

आगामी पालिका निवडणूका लक्षात घेता ठाणे जिल्ह्यात राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. विरोधी पक्षातील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाने शिवसेना शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. कल्याण शीळ रोडवरील पलावा उड्डाणपूलाचे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र हा पूल अद्याप पूर्ण झाला नाही.

शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मे महिना अखेरीस पलावा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शनिवारी या पुलाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी चे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांना देखील निमंत्रण दिले. या दोघांनी एकत्रित पाहणी करत सत्ताधारी शिवसेना शिंदे गटावर टीकेची झोड उठवल्याचे पहायला मिळाले.

मनसे नेते राजू पाटील व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे एकत्र आल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी शिवसैनिक आणि मनसैनिकांची इच्छा आहे.

याच पार्श्वभूमीवर दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिव्यात बॅनर झलकविले आहेत. या बॅनरवर ठाकरे बंधूचे एकत्रित फोटो लावण्यात आले आहेत. तसेच अमित ठाकरे व राजू पाटील यांचे ही फोटो लावण्यात आले आहेत.

कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे एकत्र हवे... गद्दारांना धडा शिकवण्यासाठी हे एकत्र हवे...असे संदेश त्यावर लिहिण्यात आला आहे. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख मुंडे याविषयी म्हणाले, कल्याण ग्रामीण मधील पलावा पुलाच्या आंदोलनात कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित झाले. तसेच दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे चैतन्य निर्माण झालं आहे.

दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही दिव्यात बॅनरबाजी केली आहे. कशासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले पाहिजेत त्या अनुषंगाने बॅनरबाजी करण्यात आली आहे असे ते म्हणाले. दरम्यान आता यामुळे आगामी पालिका निवडणूकित मनसे व ठाकरे गटाची युती झाल्यास शिवसेना शिंदे गट याला कसे सामोरे जातो हे पहावे लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.