भारत अ आणि इंग्लंड अ संघात कँटबरी येथे चार दिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (३० मे) खेळवला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने जोरदार प्रत्युत्तर दिले असून दिवस अखेर भारताकडे नाममात्र ३० धावांची आघाडी आहे. त्यामुळे हा सामना आता अनिर्णित राहण्याकडे झुकताना दिसत आहे.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी पहिल्या डावातील ५३ षटकापासून आणि २ बाद २३७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी टॉम हेन्स १४७ चेंडूत १०३ धावांवर नाबाद होता, तर मॅक्स होल्डन ६१ चेंडूत ६४ धावांवर नाबाद होता.
या दोघांनी तिसऱ्या दिवशीही सुरुवात चांगली करताना सुरुवातीला यश मिळू दिले नव्हते. त्यांच्या तिसऱ्या दिवशीही ७५ धावा जोडल्या. होल्डननेही आक्रमक खेळताना शतक पूर्ण केले. पण शतकानंतर ६८ व्या षटकात मुकेश कुमारने त्याला ध्रुव जुरेलच्या हातून झेलबाद केले. होल्डनने १०१ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह १०१ धावा केल्या.
होल्डन बाद झाल्यानंतर मुकेश कुमारने इंग्लंडला झटपट आणखी दोन धक्के दिले. त्याने कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज जेम्स ऱ्यू याला ८ धावांवर पायचीत केले, तर रेहान अहमदला सर्फराज खानच्या हातून झेलबाद केले.
त्यामुळे भारताने पुनरागमन केले असं वाटत होतं. पण हेन्सला साथ देण्यासाठी डॅन मुसली उतरला. त्यांनी ९३ धावांची भागीदारी करताना भारताची आघाडी कमी केली.
अखेर दीडशतक करणाऱ्या हेन्सला १०० व्या षटकात शार्दुल ठाकूरने सर्फराज खानच्या हातून झेलबाद केले. हेन्सने २७९ चेंजूत १९ चौकारांसह १७१ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतरही मुसलीला झमान अख्तरने साथ दिली होती. त्यांच्यातही शतकी भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान मुसलीनेही शतक पूर्ण केले.
अखेर १२४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर करुण नायरने मुसलीला पायचीत करत ही जोडी तोडली. मुसलीने १५७ चेंडूत ११३ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्या विकेटसह तिसऱ्या दिवसाचा खेळही संपला. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात १२४ षटकात ७ बाद ५२७ धावा केल्या आहेत.
भारताकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमारने ३ विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज, शार्दुल ठाकूर, हर्ष दुबे आणि करूण नायर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी भारताने पहिल्या डावात १२५.१ षटकात सर्वबाद ५५७ धावा केल्या आहेत. करुण नायरने २०४ धावांची खेळी केली. तसेच सर्फराज खानने ९२ आणि ध्रुव जुरेलने ९४ धावा केल्या आहेत.