कऱ्हाड : कार्यकर्त्यांच्या मताचा व विचारांचा सन्मान यापूर्वीच ठेवला असता तर शिवसेना पक्षच फुटला नसता, त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे पक्ष कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. मंत्री शिरसाट सांगली येथे कार्यक्रमासाठी निघाले होते. त्या वेळी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांगलीला निघण्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी भेट देऊन अभिवादन केले.
मंत्री शिरसाट म्हणाले, ‘‘शिवसेना पक्षात कार्यकर्त्यांसह त्यांच्या विचाराला व मताला काहीच किंमत दिली जात नव्हती, त्यामुळेच शिवसेना पक्ष फुटला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरे बाजूला गेले. त्यांनाही परत पक्षात आणता आले नाही. त्यामुळे मनसे व शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येतील, अशी शक्यता नाही. स्वार्थासाठी सगळे निर्णय घेणाऱ्यांवर हीच वेळ येते. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येतील, अशी कोणतीही शक्यता नाही.
’’ मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे, या वक्तव्यावर मंत्री शिरसाट म्हणाले, ‘‘प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य त्यांच्या मतदारसंघापुरते आहे. त्यांच्या मतदारसंघात ७५ टक्के हिंदी भाषिक मतदार आहेत. त्यामुळे ते तसे म्हणाले आहेत. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. त्यांचीच राहील. यात कोणतीही शंका नाही.’’ कॅगने ठेवलेल्या ठपक्याबाबत मंत्री शिरसाट म्हणाले, ‘‘कॅगने ठेवलेला ठपका हा यंत्रणेवर आहे. तो एकनाथ शिंदे यांच्यावर नाही. त्या सगळ्याची सखोल चौकशी सुरू आहे. त्यात दोषी असणाऱ्यांवर निश्चित कारवाई होणार, यात शंकाच नाही.’’
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण सर्वांचेच आदर्श आहेत. त्यांच्या समाधिस्थळी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. आयुष्यात यापूर्वी चुकून काही चुका झाल्या असतील, तर त्याची माफीही मागितली आणि त्यासाठीच कऱ्हाडला आलो.
-संजय शिरसाट