नंदिनी नरेवाडी
कोल्हापूर : सध्या आई-वडील दोघेही नोकरी, व्यवसाय करतात. यातून मुलांना वेळ कसा द्यायचा? त्यांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा?, मुलांच्या शिक्षणासाठी कोणते माध्यम, बोर्ड निवडायचा, मुली असतील तर बाहेर पडल्यावर त्या सुरक्षित राहतील का? आणि मुलांना वाईट संगत, व्यसन लागणार नाही ना, अशी आव्हाने पालकांसमोर उभी आहेत. अगदी छोटी वाटणारी ही आव्हाने पेलताना पालकांना जबाबदारीचे मोठे ओझे सांभाळत असल्याचा अनुभव येतो. यामुळेच मुलांशी दोस्ती करा, मुलांच्या वयानुसार पालकत्वाची तयारी करा असे सल्ले पालकत्व तज्ज्ञ पालकांना देत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान जसे पालकांच्या हातात खेळते आहे. तसेच पालकांसमोरील आव्हानेही बदलत आहेत. नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. त्यांना फक्त आवडीचे खेळणे, वस्तू दिली की जबाबदारी संपले असे वाटते. मात्र मुलांना त्यांच्यासोबत वेळ घालवायचा असतो. आयुष्यातील मजा-मस्ती, मित्र, खेळ यावर बोलायचे असते. माध्यम किंवा बोर्ड निवडण्यासाठीही पालकांना गहन विचार करावा लागतो. स्पर्धेच्या युगात आपले मुल टिकले पाहिजे, असे प्रत्येक पालकांना वाटते. यामुळे मुलांना भरमसाठ परीक्षांना बसवले जाते आणि त्यांचे बालपण हरवते. मुली असतील तर त्यांना शिकण्याची संधी देताना ती सुरक्षित राहील का?, याचीही भीती असते. सोशल मीडिया तसेच वाईट संगतीतून मुलांना वाईट सवयी लागतील का?, याचीही चिंता सतावते. मुले ‘टेक्नोसॅव्ही’ असल्याने मुले फास्ट होतात तर पालक मागे राहतात. यातून मतभेद होऊन मुले पालकांपासून दुरावतात. या सर्व समस्येवर तज्ज्ञांना उपायही सुचवले आहेत.
आनंदी, जबाबदार पालकत्वासाठी हे करा-
- मुलांना वेळ द्या
- मुलांचे वय वाढेल तशी तयारीही करा
- पालकांचे गट करून समुपदेशकांकडून मार्गदर्शन घ्या
- चूक झाली तर मुलांसमोर ‘सॉरी’ म्हणायला लाजू नका
- घरातील सर्व सदस्यांशी नम्रपणे व समान वागणूक द्या
- मुलांची बुद्धिमत्ता ओळखून संधी द्या
- मुलांना काय हवंय, हे ओळखायला शिका
- आनंद घ्यायला शिकवा
- छोट्या मोठ्या गोष्टीत मुलांचे कौतुक करा
सध्याच्या स्पर्धात्मक युगात मुलांकडे लक्ष न राहिल्याने मुले पुढे जात राहतात आणि पालक मागे राहतात. त्यांच्या सोबत पालक म्हणून तुमचाही शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास झाला पाहिजे. मुलांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मदत करा.
- दीप्ती देशपांडे, आनंदी बालभवन
मुलांचा कल कोणत्या आठ बुद्धीमत्ता प्रकारात आहे, हे ओळखून त्यांना संधी द्या. हे ओळखण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती त्यांना होईल, अशी संधी निर्माण करा. कौतुक हा पालकत्वाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे कौतुक करण्यात कंजूषी करू नका. मुलांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकास समतोल ठेवून होईल, याकडे लक्ष द्या.
- महेश शेटे, ऋषीसंस्कृती विद्या केंद्र
मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे, त्यावर पालकांनीच स्वतःवर बंधने घातली पाहिजेत. मुलांसाठी दिवसभरातील किमान दहा-पंधरा मिनिटे तरी द्यायला हवा. मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींत, निर्णयात त्यांना सहभागी करून घ्या.
- शैला टोपकर, कुटुंब समुपदेशक, जीवन आशय संस्था