लॉर्ड जगन्नाथच्या रथ वर सुखोई टायर्स
Marathi June 02, 2025 07:26 PM

रशियाकडून निर्मित लढाऊ विमानाच्या टायर्सचा होतोय वापर : कंपनीकडून पुरवठ्याची तयारी : 27 जूनपासून सुरू होणार रथयात्रा

► वृत्तसंस्था/ कोलकाता

इस्कॉन रथ यात्रेत यावेळी भगवान जगन्नाथाचा रथ नव्या तंत्रज्ञानाने धावणार आहे. रथात रशियन सुखोई लढाऊ विमानाचे टायर लावण्यात आले आहेत. याच टायरच्या मदतीने सुखोई विमान 280 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावपट्टीवरून झेपावत असते. भगवान जगन्नाथाच्या रथात मागील वर्षी स्टीयरिंगमध्ये झालेल्या बिघाडानंतर हे बदल करण्यात आले आहेत. सुमारे 2 दशकांपर्यंत चाललेल्या शोधानंतर नवे टायर मिळाले आहेत.

यापूर्वी भगवान जगन्नाथाच्या रथात विमानाचेच टायर वापरले जात होते. जुने टायर बोइंग बी-747 विमानाचे होते, ज्यांचा 5 दशकांपर्यत वापर करण्यात आला. आता या विमानाचा वापर होत नसल्याने टायर मिळणे देखील अवघड ठरले आहे. नव्या टायर्सचा शोध घेतला जात असताना सुखोईचे 4 फुटांचे टायर्स, बोइंगच्या टायर्सशी मिळतेजुळते आढळून आले. त्यांचा व्यास देखील 4 फूट होता आणि वजन 110 किलो होते.

रथांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

पूर्वी बी-747 चे टायर डनलॉप कंपनी निर्माण करत होती. आता एमआरएफ भारतात सुखोई एसयू-30एमकेआय लढाऊ विमानासाठी  टायर निर्माण करते. जेव्हा एमआरएफकडून रथासाठी सुखोईचे टायर मागितले तेव्हा प्रथम कंपनीला विश्वासच बसला नाही. यानंतर एमआरएफचे वरिष्ठ अधिकारी रथांचे निरीक्षण करण्यासाठी कोलकाता येथे पोहोचले. रथ 48 वर्षांपासून बोइंग 747 च्या टायर्सवर चालत असल्याचे त्यांनी पाहिले. सुखोईचे टायर आकार आणि मजबुतीने सर्वात योग्य असल्याचे त्यांना सांगितल्यावर ते आम्हाला टायर विकण्यास तयार झाल्याची माहिती इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली आहे.

तांत्रिक बिघाडाची शक्यता कमी होणार

सुखोईचे नवे टायर रथाला चालविण्यास सहाय्यभूत ठरतील. यामुळे रथ अधिक सुरक्षित आणि स्थिर राहणार आहे. खासकरून कोलकात्यातील रस्त्यांवर जेथे अनेक ठिकाणी ट्रामचे रुळ आहेत. यामुळे रथ खेचणाऱ्या भाविकांना कमी जोर लावावा लागेल आणि तांत्रिक बिघाडाची शक्यताही कमी होईल. टायर बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. रथयात्रेपूर्वी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नव्या चाकांना पारंपरिक सरंचनेत कुठल्याही बदलाशिवाय सुरक्षितपणे लावण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

रथाची पारंपरिक रचना पूर्णपणे सुरक्षित

चाकाचा ड्रम, बेस फ्रेम आणि अॅक्सेल फिटिंगमध्ये सुखोईचे टायर लावण्यासाठी काही किरकोळ बदल करावे लागले. परंतु रथाचे पारंपरिक लाकूड आणि लोखडी स्वरुप पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राधारमण दास यांनी सांगितले आहे. भगवान बलरामाचा रथ पूर्वीच नव्या लोखंडी चाकांवर चालत आहे. जुनी लोखंडी चाकं 2024 मध्ये बदलण्यात आली होती. चार चाकांपैकी एक प्रथम 2023 मध्ये बदलण्यात आले होते. बलरामाच्या रथाचे प्रत्येक चाक 6 फूटांचे असून त्यांचे वजन 250 किलो आहे.

5 टनाचा रथ खेचतात चाकं

चारही चाकांचे वजन एक टन असून ते 1977 मध्ये निर्मित 5 टनाच्या रथाला खेचतात. सुभद्रा देवीच्या रथाची चाकं स्टीलने निर्मित असून चांगल्या स्थितीत आहेत. ही चाकं अद्याप अनेक वर्षांपर्यंत चालतील अशी अपेक्षा आहे. भगवान जगन्नाथाच्या रथात मागील वर्षी स्टीयरिंगशी निगडित समस्या निर्माण झाली होती, जी दूर करण्यात आली आहे.

वेग-दिशा नियंत्रित करणे सोपे

या पूर्ण बदलाचा उद्देश भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरक्षित आणि सुगम व्हावी हा आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय यात्रा पूर्ण व्हावी याकरता हे बदल करण्यात आले आहेत. नव्या टायर्सच्या मदततीने रथाचा वेग आणि दिशा नियंत्रित करणे सोपे ठरणार आहे. तसेच रथाच्या देखभालीत मदत मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.