पैठण - आषाढी वारीनिमित्त येथील संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे १८ जूनला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. चांदीपासून बनविलेल्या रथात प्रथमच संत एकनाथ महाराज यांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत. पुण्यात चांदीच्या रथाची तयारी सुरु आहे.
वारकरी, भाविक, भक्तांचे सहकार्य, लोकवर्गणीतून नाथ महाराजांच्या चांदीच्या रथाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रथ निर्मितीच्या कार्यासाठी पालखी सोहळ्यातर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे. रथाचे काम पुणे येथील रथ निर्मिती तज्ज्ञ रमेशभाई मिस्री व राजूभाई मिस्री करीत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या रथाचे काम देखील त्यांनीच केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सागवानी लाकूड वापरून त्यावर १२० किलो शुद्ध चांदी चढविण्यात येणार आहे.
आतापर्यंत लोकवर्गणीतून ८० किलो चांदी जमा झाली आहे. रथावर चांदी बसविण्याचे काम सुरू आहे. आणखी ४० किलो चांदीसाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांनी केले आहे.
रथाच्यासाठी...
१२० किलो चांदी
२१ लाख रुपये मजुरी
११० चौ. घनफूट सागवानी लाकूड
संत एकनाथ महाराज यांच्या पादुका चांदीच्या रथातून पंढरीला जाव्यात, अशी वारकरी, भक्तांची इच्छा होती. त्यानुसार लोकवर्गणीतून चांदी रथाचा संकल्प पूर्ण होत आहे. यावेळी प्रथमच चांदीच्या रथातून पादुका चांदीच्या रथातून जातील.
- रघुनाथ महाराज गोसावी, पालखी सोहळा प्रमुख