माणूस समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे तो सर्वसामान्य माणसांमधली प्रज्ञा, प्रतिभा, रसिकता, सद्भाव, शहाणपणा यातूनच समाज घडवत असतो. माणसं संस्कृती निर्माण करतात. संस्कृतीचा वारसा दान म्हणून माणसाला मिळतो. पण हे दान म्हणजे कायमचं भांडवल नसतं.
हे दान स्वीकारून आपण आपल्या सामूहिक स्वरूपाच्या सम्यक कृतीचे प्रवाह मानवी कल्याणाच्या दिशेनं बदलत व विस्तारत नेले तरच ती संस्कृती विकसित होत राहते.
जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ग आदी विषमता जोपासणाऱ्या पुरुष प्रधान व्यवस्थेत खरी संस्कृती तग धरून कशी राहणार?
सध्याच्या बाजारू संस्कृतीत तर सर्व माणसांचं क्रेता आणि विक्रेता यात विभाजन झालं आहे. माणसांची नाती, भावना या सर्वच विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.
यातून लग्न हा संस्कारसुद्धा सुटला नाही. लग्नाचा बाजार मांडला जात आहे. तो पण आता एक चकचकीत, झगझगीत इव्हेंट बनला आहे.
या इव्हेंटमध्ये श्रीमंतीचे अनेकदा हिडीस वाटावं असं प्रदर्शन करण्याची चढाओढच होते आहे.
राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी ही एक संधी सुद्धा मानली जाते आहे, हे अतिशय चिंताजनक वास्तव आहे. अशा लग्नात अनेकदा स्त्रियांचं खच्चीकरण, वस्तूकरण आणि शोषण होताना दिसतं. त्याचं भीषण, टळटळीत उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणेचा विवाह आणि त्यानंतरची तिची आत्महत्या!
तिची आत्महत्या हे हुंडा या दुष्ट प्रथेचं स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार, हिंसाचार आणि शोषणाचं वर दिसणारं हिमनगाचं फक्त टोक आहे, हे लक्षात घेऊ या.
मराठा जातीत जन्मलेल्या वैष्णवीच्या शोकात्म आत्महत्येनंतर मराठा जातीनं तर विवाह सोहळ्यासंदर्भात आणि हुंडा प्रथा बंद करण्यासाठी आचार संहिताच जाहीर केली आहे.
त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जणांची सुकाणू समिती नेमली आहे.
यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. या समितीत स्त्रियांची संख्या नगण्य का आहे, याचा मात्र विचार व्हायलाच हवा. हे सर्व करत असतानाच हुंडा प्रथेची पाळेमुळेही खणून काढायला हवीत ना?
म्हणजे मग हुंडाविरोधी तात्पुरती वरवरची मलमपट्टी न होता हुंडा प्रथेचा समूळ नायनाट करता येईल.
हुंडा प्रथेच्या मुळाशी पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था आहे. 'योनीला लाज आणि शिश्नाला माज' हे या व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
बाईच्या शरीरातून मूल जन्माला येतं. त्यामुळे, आई कोण, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. मात्र, पिता कोण, याविषयी संदिग्धता राहते. ती दूर करून पिता निश्चित करण्यासाठी विवाह संस्था आली. स्त्रीच्या योनी शुचितेमुळेच पुरुषाचं पितृत्व वादातीत राहणार म्हणून तिच्या आचार, विचार आणि संचारावर बंधनं घालून तिचं गृहिणीकरण करत तिला 'पुरुषावलंबी' केलं गेलं.
लिंगाधिष्ठीत श्रम विभागणी म्हणजे स्त्रीने घरकाम, बालसंगोपन करायचं. त्याला पैसा नाही म्हणून प्रतिष्ठा नाही आणि पुरुषाने घराबाहेर पडून काम करायचं, त्याला मात्र पैसा मिळणार. त्यातून घर, जमीन-जुमला त्याच्या नावावर खरेदी करणार आणि त्याला प्रतिष्ठा मिळणार.
हे विवाह संस्थेचं दुसरं व्यवच्छेदक लक्षण आहे. स्त्री चोवीस तास करत असलेल्या घर कामाला वेतन नाही त्यामुळे ती आर्थिक दृष्ट्या पुरुषावलंबी झाली. आणि, नवऱ्याची गुलाम बनली. या गुलामांचा मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ हा पतीचा अधिकारच आहे, अशी धारणा या विवाह संस्थेत खोलवर रुजली आहे.
हुंडा बळी, सासरी होणारा स्त्रियांचा छळ हे त्याचेच आविष्कार ठायी ठायी दिसत असतात.
लैंगिक संबंधाबाबत तर विवाह संस्थेची एकाधिकारशाही आहे. मातृत्व ही स्त्रीची अनन्यसाधारण असणारी क्षमता विवाहाच्या दावणीला बांधून विवाहबाह्य मातृत्व कलंकित ठरवलं गेलं. अशी स्त्री कुलटा ठरवली. त्यामुळे स्त्रियांसाठी लग्न करणे आणि ते टिकवणे हे जीवनाच अंतिम ध्येय ठरलं. स्त्रीची अब्रू हे काचेचं भांडं असतं, असं म्हणत तिचं वस्तूकरण करत स्त्रीचं माणूसपण हिरावून घेतलं गेलं.
मुली या आईबापाच्या गळ्याचा फास बनल्या. अशा मुलींचं लग्न कधी एकदा करुन जबाबदारीतून मोकळे होतो या विवंचनेत बाप मागेल तेव्हढा हुंडा द्यायला तयार होतो आणि मुलींचा छळ झाला तरी खानदानाच्या इज्जती साठी त्यांना सासरीच नांदायला भाग पाडतो.
म्हणूनच, हुंडाबळीला सासर इतकंच माहेरही जबाबदार आहे. तसंच स्त्रीला दुय्यम लेखणारे आपण सर्व समाज घटक म्हणजे तुम्ही आम्हीही त्यात सामील आहोत, हे विसरायला नको.
हुंडा बळी आणि स्त्रियांवरचे अत्याचार, हिंसाचार थांबवण्यासाठी ही पुरुष प्रधान व्यवस्थाच बदलायला हवी. समतावादी व्यवस्था येण्यासाठी स्त्री चळवळ काम करते आहे. चळवळीच्या प्रभावामुळे सरकारने स्त्रियांना न्याय देण्यासाठी कायदे केले आहेत. त्याची अंमलबजावणी चोख करण्यासाठी पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्थेतल्या स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांचे लिंगभाव समतेसाठी सातत्यानं, सखोल प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे.
स्त्री चळवळ ही पुरुष विरोधी नाही तर ती पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेविरोधात लढते आहे. लिंग जन्माने मिळतं; पण या व्यवस्थेत विषमतेवर आधारित पितृसत्ताक पुरुषप्रधान विवाह संस्था बळकट करण्यासाठी बाईपणा, पुरुषपणा आणि इतरपणा घडवला जातो. त्याला लिंगभाव म्हणतात.
स्त्री चळवळीमुळे बाईपणाचे अन्यायकारक साचे मोडायलाच हवेत, हे स्त्रियांच्या लक्षात आलं आहे. ते मोडत स्त्रिया स्वतंत्र होत माणूसपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पुरुषांच्या हाती सत्ता असल्याने (जी अनेकदा माणसांना भ्रष्ट करते) आपण स्वतंत्र नाही तर आपण पुरुषपणाच्या साच्यात बंदिस्त आहोत.
आपण रडू शकत नाही नाही, घाबरून चालत नाही, पैसे मिळवण्याची सक्ती आहे, संरक्षकाची भूमिका घ्यावी लागते. यामुळे, चांगलं माणूस होण्यात आपल्याला अनेक अडथळे आहेत याची जाणीव पुरुषांना पुरेशी झालेली नाही, याची खंत वाटते. म्हणून पुरुषांना स्त्री चळवळीत सहभागी होऊन पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी पुढे व्हा, असं आवाहन करावंस वाटतं.
गेले 50, 60 वर्ष स्त्री चळवळ, शिक्षण आणि नोकरी यामुळे अनेक स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्या लग्न, मूल जन्माला घालावं की नाही? कधी, किती मुलं जन्माला घालावी, यासंदर्भात पुढाकार घेऊन निर्णय घेऊ लागल्या आहेत. जोडीदाराविषयी त्यांच्या काही स्पष्ट कल्पना आहेत, तसा जोडीदार मिळाला नाही तर त्या लग्न न करता स्वतंत्रपणे एकट्या राहतात.
लग्नात अन्याय होतो आहे, असं दिसलं तर घटस्फोट घेऊन स्वतंत्र होतात. पारंपरिक पुरुषत्वाच्या पुरुषप्रधान कल्पना आणि स्त्रियांच्या बदललेल्या अपेक्षा यांच्यामुळे पुरुष गोंधळले आहेत, काहीसे घाबरले आहेत.
लग्न होईल की नाही? झालं तर टिकेल की नाही? या असुरक्षिततेतून ते जास्त आक्रमक होत आहेत का? याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. पुरुषांची झालेली ही कोंडी त्यांना समजावून सांगत ती फोडण्यासाठी त्यांनी मदतीचा हात घेण्याची गरज आहे. त्यात काही कमीपणा मानू नये. त्यासाठी घरातली पुरुषांची दडपशाही दूर करुन कुटुंबात लोकशाही रुजवायला हवी.
मात्र, पुरुषी अहंकारामुळे अनेकदा पुरुषांना 'हे कळतं, पण वळत नाही' अशी त्यांची कोंडी झाली आहे. हे लक्षात घेऊन पुरुषांनी वेळीच मदत घेतली पाहिजे.
ही कोंडी फोडायला स्त्रीची मदत घेतानाही कमीपणा मानू नये. त्यातच त्यांचं, कुटुंबाचं आणि पर्यायाने समाजाचे भलं आहे. मात्र, त्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलण्याचं अतिशय अवघड काम तुम्हा-आम्हा सर्वांना करावं लागेल.
मनाची जडणघडण हा अतिशय गहन आणि गुंतागुंतीचा व्यवहार आहे. हजारो वर्षं चालत आलेल्या पितृसत्ताक पुरुष प्रधान विवाह संस्थेला बळकटी मिळेल, अशा प्रकारची स्त्री पुरुष मानसिकता आजवर घडवली गेली. या व्यवस्थेची पाळेमुळे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण आणि अर्थकारण यांमध्ये खोलवर रुजलेली आहेत.
स्त्री पुरुष दोघांचीही मानसिकता समतावादी होण्यासाठी विवाहाचा पाया स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभाव असा हवा, अशी आग्रही मागणी स्त्री चळवळ करत आहे. त्यातून समन्वय, संवाद, परस्पर सामंजस्य यावर आधारलेलं सहजीवन शांत आणि समाधानी असेल.
स्वास्थ्यपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी हे गरजेचं आहे. अशा समाज परिवर्तनासाठी विषमतेवर आधारित बाईपणा पुरुषपणा आणि इतरपणा ओलांडत माणूसपणाची वाटचाल सर्वांनी हातात हात घेऊन करण्याची गरज आहे.
आजच्या समाज माध्यमांच्या खऱ्या खोट्या बातम्यांच्या कल्लोळामुळे बलात्कार, अत्याचार आणि स्त्रीची दुरावस्था हेच आपले सामाजिक सांस्कृतिक चित्र आहे, असं वाटून आपल्या जगण्यावर नैराश्याचं मळभ आलं आहे. पण, आपल्या समाजातला सद्भाव, विवेक आणि शहाणपणाही वाढतो आहे.
अविवेक उग्र असतो म्हणून तो भडकपणे दिसतो. विवेक शांत, सौम्य असतो. त्याचा चेहरा तो आक्रोश करून दाखवत नाही, हे लक्षात घेऊन आशावादी राहू या. समाजातला अविवेक कमी करण्यासाठी सक्रिय राहण्याला पर्याय नाही. 'दोस्ती जिंदाबाद' म्हणत काम करत राहू या.
लेखात मांडलेले विचार हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)