रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. आरसीबीने मंगळवारी (३ जून) अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले. या विजयासह आरसीबीने १८ वर्षांची प्रतिक्षा संपवली आणि विजेतेपदाला गवसणी घातली. या विजेतेपदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आरसीबी संघ दुसऱ्याच दिवशी बुधवारी बंगळुरूत दाखल झाला होता.
आरसीबीचा चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकार आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनकडून गौरव झाला. पण याचवेळी संघ येणार असल्याचे कळताच चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी झाली.
स्टेडियममध्ये सत्कार सोहळा सुरू असताना बाहेर मात्र चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ११ जणांनी जीव गमावले, तर अनेक जण जखमी आहेत. याबाबत अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावरही टीका होत आहे.
याबाबत आता भारताचा कर्णधार गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय कसोटी संघ गुरुवारी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याआधी नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि गंभीर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. यावेळी गंभीरला बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी म्हणाला, जे झालं, ते दुर्देवी होतं. तो स्वत: कधीही रोड शो करण्यासाठी उत्सुक नव्हता. आनंद साजरा व्हायला हवा, सेलिब्रेश व्हायला हवे, पण व्यक्तीचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. जर पूर्ण तयारी नसेल, तर असे रोड शो व्हायला नको.
गंभीर म्हणाला, 'रोड शोची आवश्यकता आहे, यावर माझा कधीही विश्वास नव्हता. २००७ टी२० वर्ल्ड कप विजयानंतरही मी खेळत असताना माझं हेच मत होतं. लोकांचे जीव अधिक महत्त्वाचे आहेत. माझं हे मत कायम राहिल. आता पुढे आपण अधिक जागरुक असायला हवं. असे कार्यक्रम बंद दरवाजामागे किंवा स्टेडियममध्ये आयोजित करावेत. जे घडलं, ते दुर्दैवी होतं. आपण सर्वजणच त्यासाठी जबाबदार आहोत. भविष्यकाळात असं पुन्हा घडू नये, अशी माझी इच्छा आहे.'
यादरम्यान आरसीबीने बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेत जीव गमावणाऱ्या चाहत्यांच्या कुटुंबासाठी १० लाखांची मदतही जाहीर केली आहे. तसेच जखमींचा खर्चही उचलणार असल्याचे सांगितले आहे. कर्नाटक सरकारनेही १० लाखांची मदत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबासाठी जाहीर केली आहे.