मुंबई : निधीच्या वाटपावरून राज्य मंत्रिमंडळातील मिंधे (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट) मंडळ अर्थखात्यावर म्हणजेच अजित पवार यांच्यावर नाराज आहे. वास्तविक महायुतीच्या सरकारमध्ये खुद्द मिंध्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे आणि पुन्हा या नाराजीची बोंब करण्याची सोयही राहिली नाही. त्यामुळे नाराज झाले की, साताऱ्यातील गाव गाठायचे आणि शेतातील स्ट्रॉबेरी मोजायच्या, हा नाराजीवरील अक्सीर तोडगा जसा मिंध्यांनी शोधून काढला तसाच काही तोडगा त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना दिला असेल तर सांगता येत नाही, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Thackeray Vs Shinde: Thackeray targets Shinde over displeasure with Ajit Pawar)
महाराष्ट्रातील फडणवीस, मिंधे, अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजीनाट्य रंगले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निधीअभावी अस्वस्थ झालेल्या मंत्र्यांच्या नाराजीला तोंड फुटले. ‘दादा पैसेच देत नाहीत भाई’, असे रडगाणे घेऊन मिंधे गटाच्या मंत्र्यांनी म्हणे नाराजांच्या सरदाराची भेट घेतल्याचे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Ajit Pawar Vs BJP : ठाकरे म्हणतात, अमित शहांनी भाजपा आमदारांना दिला हा आदर्श कानमंत्र
‘सह्याद्री’ अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीत निधीअभावी त्रस्त झालेल्या मंत्र्यांनी मिंध्यांसमोर अजित पवारांच्या तक्रारींचा पाढा वाचला. ‘‘अर्थमंत्री अजितदादा आमच्या खात्याच्या विकासकामांत खोडा घालत आहेत. अर्थखाते आणि अर्थमंत्री आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही विकासकामे कशी करायची?’’ अशी तळमळ म्हणा की तगमग या मंत्र्यांनी व्यक्त केली. अजित पवारांना टार्गेट करण्यासाठीच ही बैठक झाली, असे सांगण्यात येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मूळ शिवसेनेशी बेइमानी करताना मिंध्यांच्या लोकांनी अजित पवार यांनाच ‘व्हिलन’ ठरवले होते. मात्र तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तुरुंगात जाण्याऐवजी मिंध्यांच्या पावलावर पाऊल टाकून सरकारमध्ये आले आणि अर्थमंत्रीदेखील झाले. मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या नाड्या अर्थखात्याकडे, पर्यायाने अजितदादांकडे आल्या आणि दादांनी या नाड्या आवळून धरल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला, अशी टीका त्यांनी केली.
या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातील सर्व मंत्र्यांच्या खात्यांचा स्वतंत्र आढावा घेतला. एकेका मंत्र्याला बोलावून त्यांच्या खात्यातील कामांची माहिती घेतली. तेव्हा ‘‘अजितदादा आमच्या खात्याला पैसेच देत नाहीत. मग कामे कशी होणार आणि कामे झाली नाहीत तर निवडणुकीला सामोरे कसे जाणार आणि लोकांना काय उत्तरे देणार?’’ असे प्रश्न जनहिताच्या मुद्द्यावर व्याकूळ वगैरे झालेल्या मंत्र्यांनी या बैठकीत मांडले. सगळ्यांच्या तक्रारींचे स्वरूप आणि ‘लक्ष्य’ एकच असल्याने या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून मार्ग काढू, अशी समजूत काढत नाराजांच्या सरदारांनी वेळ मारून नेल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – Thackeray on Mahayuti : नाराजीच्या मूळव्याधीने मिंध्यांचे मंत्री पुन्हा हैराण, ठाकरेंचा हल्लाबोल