‘पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणार…’, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकला अल्टीमेटम देताना शस्त्रसंधीबाबत केले महत्वाचे वक्तव्य
GH News June 10, 2025 12:07 PM

भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. परंतु दोन्ही देशांतील तणावाचे कारण संपलेले नाही. यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही तर स्थगित केल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. आता जर पाकिस्तानने पुन्हा भारताला चिथावणी दिली तर भारत पाकिस्तानच्या आत कुठेही हल्ला करण्यास तयार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ब्रुसेल्सच्या भेटीदरम्यान पॉलिटिकोशी बोलताना हे वक्तव्य केले. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले की, पाकिस्तान हा एक असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर देशाचे धोरण म्हणून करतो. हाच कळीचा मुद्दा आहे.

पॉलिटिकोशी बोलताना डॉक्टर जयशंकर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचे लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. त्यामुळे पाकिस्तान गुडघे टेकत शस्त्रसंधीसाठी तयार झाला. राफेल असो की इतर क्षेपणास्त्रे हे किती प्रभावित होते, त्याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेली हवाईतळ आहेत.

१० मे रोजी नेमके काय घडले, ते सांगताना एस.जयशंकर यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील हल्ले १० मे रोजी एकाच कारणामुळे थांबले. त्या दिवशी सकाळी आम्ही आठ पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केले. त्या हवाई तळांचे प्रचंड नुकसान केले. माझ्या शब्दांवर विश्वास ठेऊ नका, परंतु उपग्रहद्वारे गूगलवर उपलब्ध असलेल्या फोटोंवर विश्वास ठेवा. ज्या धावपट्टीवर आणि रन वे वर हल्ले झाले, त्याचे फोटो तुम्ही पाहू शकतात.

एस.जयशंकर यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत ईशारा दिला. ते म्हणाले, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. त्यानंतर त्या दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहे. आता हे आम्ही सहन करणार नाही. आमचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि दशतवाद्यांना मदत करण्याचे सुरुच ठेवले तर पाकिस्तानच्या कोणत्या भागात ते दहशतवादी आहेत, त्याचा विचार आम्ही करणार नाही. ते जेथे असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही कारवाई करणार आहोत.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची हत्या केली होती. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेझिस्टंट फ्रंट’ या संघटनेने स्वीकारली होती. यानंतर पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ६ आणि ७ मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तान १० मे रोजी शस्त्रसंधीसाठी भारताकडे भीक मागितली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.