Why did return from England before Test series? भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वीच्या शेवटच्या सरावाला आजपासून सुरुवात होतेय. भारत विरुद्ध भारत अ अशा संघांमध्ये आजपासून सराव सामना सुरू होतोय आणि त्यातून इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार, हे ठरेल. पण, या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला तातडीने मायदेशार परतावे लागले आहे. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी हे कोणतं संकट ओढावलं आहे? असा प्रश्न पडू लागला आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या कसोटीतून निवृत्तीनंतर भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. गौतमने दोन दिवसांपूर्वी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि विराट, रोहितच्या अनुपस्थितीत वाढलेल्या जबाबदारीची जाण करून दिली. युवा खेळाडू ची मालिका गाजवण्यासाठी आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तयार आहेत. पण, मास्तर गंभीरच आता मायदेशी परतले आहेत.
भारत विरुद्ध भारत अ संघातील सराव सामना आणि इंग्लंड कसोटी सामन्यांच्या सुरुवातीपूर्वी गौतम गंभीर भारतात परतला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू गेल्या आठवड्यात भारतीय संघासह ब्रिटनमध्ये दाखल झाला होता. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाला तयारी करण्यास मदत करण्यासाठी गंभीर बेकेनहॅम येथील केंट काउंटी क्रिकेट क्लबमध्ये सराव सत्रात गिल आणि कंपनीचे नेतृत्व करत होता.
RevSportz च्या वृत्तानुसार गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तो घरी परतला. मुख्य प्रशिक्षकाची आई सध्या अतिदक्षता विभागात आहे, असे त्या वृत्तात म्हटले आहे. २० जूनपासून मालिका सुरू होणार असल्याने, गंभीर संघात पुन्हा कधी सामील होईल हे पाहावे लागेल.
इंग्लंडविरुद्धची ही मालिका गंभीरची प्रशिक्षक म्हणून चौथी कसोटी मालिका असेल. २०२४ मध्ये राहुल द्रविडचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपला आणि गंभीर नवा प्रशिक्षक म्हणून समोर आला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात विजयी केली, कारण भारताने घरच्या मैदानावर बांगलादेशला व्हाईटवॉश करण्यात यश मिळवले. पण, त्यानंतर रोहित शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ३-० असा आणि त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागला.