WTC Final सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनी हाताला बांधली काळी पट्टी, कारण की…
GH News June 13, 2025 10:06 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फलंदाजीला उतरले. तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. त्यामुळे नेमकं असं का केलं याबाबत चर्चा रंगली होती. पण बहुतांश लोकांना माहिती होतं की दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.सर्व खेळाडू लवकर मैदानावर पोहोचले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी दोन्ही देशाच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळत मृत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे, इंग्लंड दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडूही काळ्या पट्ट्या घालून मैदानावर आले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकृत एक्स हँडलवर लिहिलं की, “बेकेनहॅम येथे सुरू असलेल्या संघाच्या अंतर्गत सामन्यादरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने हातांना काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज एक मिनिट मौन पाळण्यात आले. हे मृतांच्या आदराचे आणि पीडित कुटुंबांसोबत असल्याचं दर्शविणारे प्रतीक आहे.” भारतीय संघ आणि भारत-अ यांच्यातील इंस्ट्रा स्क्वॉड सामना 13 जून रोजी बेकेनहॅम काउंटी मैदानावर सुरू झाला. 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय खेळाडू या सामन्याद्वारे स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेऊ इच्छितात.

गुरुवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने अहमदाबाद विमान तळावरून उड्डाण घेतलं. पण अवघ्या 10 सेकंदात विमान कोसळलं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटीश, 7 पोर्तुगाल आणि एक कॅनडाचा नागरीक होता. या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला तर एकच नागरिक बचावला आहे. तर जमिनीवरील 25 जणही या अपघातात दगावले. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.