फुरसुंगी - पावसाच्या जोरदार आगमनाने शुक्रवारी दिवेघाटातील धबधबे भरभरुन वाहिले. वाहणाऱ्या पाण्याचा जोर पहाता पालखी सोहळ्या दरम्यान प्रशासनाला यावर्षी पाऊस डोकेदुखी ठरण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
घाट परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने येथील धबधबे ओसंडून वाहत होते. काही धबधब्यांनी रौद्र रूप धारण केल्यासारखे दिसत होते. घाटातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होते.
पाण्याचा वेग पाहता वाहनचालक सावधगिरीने वाहन चालवताना दिसत होते. घाटात रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने पावसाच्या पाण्यासोबत येथील राडारोडा मोठ्याप्रमाणात रस्त्यावरून वाहत होता.
त्यामुळे पाऊस जरी थांबला तरी मार्गावर काही ठिकाणी चिखल झाला. त्यातून मार्ग काढताना चारचाकी वाहन चालकांची देखील तारांबळ होत होती.पालखी सोहळा काही दिवसांवर आला असताना घाटात अश्या पद्धतीने पाणी वाहणे आणि चिखल होणे ही चिंताजनक बाब आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने गाफील राहू नये. यावर योग्य उपाययोजना कराव्यात, असे येथील रहिवाशी सागर मोडक, महेश गायकवाड, संदीप मोडक, प्रवीण मोडक यानी सांगितले.