Atul Save : शेतकरी कर्जमाफी जाहीरनाम्यात नव्हती
esakal June 15, 2025 06:45 AM

हिंगोली - भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कोणताही विषय नव्हता असा दावा पक्षाचे नेते व कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी हिंगोली येथे शनिवारी केला आहे.

हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना ‘मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे’ या मुद्यावर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदी पदाधिकारी उपस्थिती होते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा देणार असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, ‘आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा विषय नव्हताच. तुम्ही जाहीरनामा तपासून पाहा. त्यात ज्या बाबी नमूद आहेत, त्या प्राधान्यक्रमाणे पूर्ण केल्या जात आहेत. नदीजोड प्रकल्प व वॉटर ग्रीडच्या ६१ हजार कोटी रुपयांच्या आराखड्याच्या सर्वेक्षणासाठी निधी देण्यात आला आहे.

देशातील हा सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. त्यामुळे राज्याची तहान भागणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५० वर्षे दुष्काळ पडला किंवा पाऊस पडला नाही तरी, समुद्रात जाणारे पाणी या महाराष्ट्राला मिळेल. यामुळे येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही.’

संजय राऊतांवर टीका

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादेतील विमान दुर्घटना सायबर हल्ल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यावर सावे यांनी त्यांच्यावर टीका केली. विमान दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे. त्यातून सर्व सत्य बाहेर येईल. अशा घटना सायबर हल्ल्यामुळे होत नाहीत. त्यामुळे राऊतांनी चुकीचे वक्तव्य करू नये, असे ते म्हणाले.

तांडावस्तीच्या कामांना स्थगिती दिल्याच्या प्रश्नावर सावे यांनी काही कामे अपूर्ण होती, ती कामे पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी आता नव्याने प्रस्ताव मागविले जात आहेत. हे प्रस्ताव आल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल, असे ते म्हणाले.

बच्चू कडूंचे प्रश्न मार्गी लागतील -

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपोषणावरही सावे यांनी भाष्य केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट झाली असून पुढील काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होईल. त्यातून त्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील, असे ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.