सांगली : 'पनवती संजय राऊत आणि त्यांचा पक्ष आहे', अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. 'विद्यमान ६८ नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे ६८ ठिकाणी आधी माणसं शोधा,' असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी राऊतांना लगावला आहे. विमान दुर्घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या पनवती टिकेवरून चंद्रकांत पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सांगली मारुती चौकात भाजप सांगली शहरतर्फे मोदी सरकारच्या ११ वर्षांतील उल्लेखनीय विकासकामांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, 'संजय राऊत यांना प्रत्येक गोष्टीत छिद्र दिसतं. त्यांची नजर पिवळी वाटते. त्यांना कावीळ झाला असून, मला माहिती आहे त्याच्यावर काय औषध आहे. ते औषध मिळेपर्यंत असेच करत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १५ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले असून, ११ वर्ष काम करीत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे मिळून तब्बल २५ वर्ष एका उच्चपदावर राहण्याचा त्यांनी विक्रम केला. भारतात सोडा जगातही असा विक्रम कुणाला करता आला नाही. त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला आहे.'
काय म्हणाले होते?
पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील कुंडमळा येथे पुल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून ५० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षितेचा आणि नदीवरील जुन्या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला असून महाराष्ट्रमध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला होता.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये सतत होत असलेल्या दुर्घटनेवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. खासदार राऊत म्हणाले की, 'हे सरकार आल्यापासून सातत्याने अपघात घातपात, दहशवादी हल्ले सुरू आहेत, पहलगाम झालं, अहमदाबादला विमान अपघात झाला. काल दोन दुर्घटना घडल्या आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा खचला. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. केंद्रातला आणि राज्यातला या सरकार पनवती सरकार म्हणायला हरकत नाही,' असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.