सांगली : सांगलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशामुळे आता सांगलीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. तसेच सांगलीत काँग्रेसपुढे आव्हान देखील वाढणार आहे. या पक्षप्रवेशात काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते वसंत दादा पाटील यांच्या घराण्यातील मोठा गट भाजपमध्ये सहभागी झाला आहे. जयश्री पाटील या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. तसेच त्या माजी दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. जयश्री पाटील या सांगलीतल बड्या नेत्या आहेत. त्यामुळे भाजपला त्यांच्या राजकीय ताकदीचा चांगलाच फायदा सांगलीत होण्याची शक्यता आहे.
जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'भारतीय जनता पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं. सांगली महापालिका असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, तिथे दोनवेळा खासदार असतील, आमदार असतील, अशा विविध जागी भाजपला खूप चांगलं यश सांगली जिल्ह्यात मिळालं. त्यामुळे आमची साहजिक अपेक्षा होती की, आपला पक्ष सांगलीत आणखी मजबूत करण्यासाठी अजून चांगली मंडळी जी वेगवेगळ्या पक्षात आहेत, पण त्यांना तिथे न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन अतिशय मजबुतीने काम वाढवलं पाहिजे, असा विचार आला', असं म्हणाले.
'सगळ्यांनी विशेष प्रयत्न केला. त्यामुळे आज यांचा प्रवेश झाला आहे. मी त्यांच्यासोबत जेव्हा बोललो तेव्हा ताईंनी सांगितलं होतं की, माझ्या प्रवेशाला तुम्ही आलंच पाहिजे. खरंतर आपल्याकडे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश होतात. मुख्यमंत्री प्रवेशाला फारसे हजर राहत नाही. पण मला देखील वाटलं की, एवढ्या मोठ्या वसंत दादांच्या घराण्यातील जयश्रीताईंचा प्रवेश असल्यामुळे आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे, असा विचार आला. त्यामुळे मी सुद्धा या प्रवेशाच्या कार्यक्रमाला आलो', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.