मुंबई - ‘माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कार्याची धुरा त्यांच्या नातसून जयश्री पाटलांनी सांभाळली, पण पक्षाने काही त्यांना सांभाळले नाही. मात्र भाजप परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल,’ असे टोले काँग्रेसला मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयश्री पाटील यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
काँग्रेसने आपल्यावर नेहमीच अन्याय केला असल्याची टीका करत जयश्री पाटील यांनी सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा असलेल्या जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत तर काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. जयश्री पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. या वेळी आ.सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की वेगवेगळ्या पक्षात चांगले लोक आहेत, ज्यांना त्यांच्या पक्षात न्याय मिळत नाही. त्यांना सोबत घेऊन आपल्या पक्षाचे काम वाढवायला पाहिजे, असा निर्णय आपण घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी फडणवीस यांनी वसंतदादा पाटील यांच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांचे स्मरण केले.