'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re ) हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार येतात आणि आपली पाककौशल्य दाखवतात. चवदार रेसिपीसोबतच येथे फुल कॉमेडी देखील पाहायला मिळते. अमेय वाघने आपल्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला चारचाँद लावले आहेत. मात्र आता 'शिट्टी वाजली रे'च्या सेटवर एक गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'वाजली रे' कार्यक्रमात आगामी भागांमध्ये 'अबोली' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचे कलाकार सेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. मात्र रेसिपी बनवताना वाघच्या रागाचा (Amey Wagh Angry) भडका उडलेला व्हिडीओत दिसत आहे. नवीन प्रमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'अबोली'मालिकेतील अबोली (गौरी कुलकर्णी) आणि 'घरोघरी मातीच्या चुली'मधील ऐश्वर्या (प्रतीक्षा मुणगेकर) यांच्यामध्ये बनवलेल्या पदार्थामुळे झटापट होते आणि या झटापटीत अबोलीच्या हातातील ताट खाली पडते आणि तो पदार्थ वाया जातो. हे पाहून अमेय वाघ चिडतो.
प्रोमोच्या व्हिडीओत अमेय बोलतो की, "हे असं अन्न सांडणं बरोबर नाही. वया जाणे चुकूचे आहे. असे होणे तुमच्याकडून अपेक्षित नव्हते." त्यानंतर सेटवर सर्वजण जोराजोरात भांडू लागतात. तेव्हा अमय जोरात ओरडतो की, "अरे बास्स यार...भांडणाचा शो आहे का हा?" त्याच्या अशा बोलण्यामुळे सर्वचजण शांत बसतात. आता शो मध्ये पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'शिट्टी वाजली रे'च्या या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही नेटकऱ्यांना घडलेला प्रकार अजिबात पटला नसून ते याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही नेटकरी हा प्रॅन्क असल्याचे बोलत आहेत. कारण शोमध्ये असे विनोद होत राहतात. मात्र हा प्रॅन्क होता की खरंच अन्नाची नासाडी करण्यात आली हे तुम्हाला येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल.