इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. यजमान इंग्लंडने दमदार कामगिरी करत दुसरा दिवस आपल्या नावावर केला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 359 धावा केल्या. भारताने यासह पहिला दिवस आपल्या नावावर केला. मात्र इंग्लंडने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. इंग्लंडने भारताला झटपट 7 झटके देत पहिल्या डावात 471 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडने खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 49 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 209 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड अजूनही 262 धावांनी पिछाडीवर आहे. ओली पोप याने इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकी खेळी केली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह यानेच तिन्ही विकेट घेतल्या. मात्र दुसऱ्या बाजूने बुमराहला गोलंदाजांसह खेळाडूंकडूनही चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाला सामन्यात कायम राहायचं असेल तिसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करावं लागेल.
टीम इंडियाने 359 धावांपासून दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या दोघांनी टीम इंडियाच्या खेळाला सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी दुसऱ्या दिवशी आणखी 71 धावा जोडल्या. गिल-पंत जोडीने चौथ्या विकेटसाठी विक्रमी 209 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन आऊट झाला. शुबमनने 147 धावा केल्या. शुबमनसह भारताची घसरगुंडी झाली. भारताने शेवटच्या 7 विकेट्स अवघ्या 41 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. टीम इंडिया अशाप्रकारे पहिल्या डावात 113 ओव्हरमध्ये 471 रन्सवर ऑलआऊट झाली.
भारतासाठी गिल व्यतिरिक्त ऋषभ पंत याने 134 तर ओपनर यशस्वी जैस्वाल याने 101 धावांची खेळी केली. मात्र तिघांच्या शतकानंतरही भारताला 500 धावाही करता आल्या नाहीत. केएल राहुल याने 42 धावांचं योगदान दिलं. डेब्यूटंट साई सुदर्शन, करुण नायर आणि जसप्रीत बुमराह या तिघांना भोपळा फोडता आला नाही. जडेजाने 11 धावा केल्या. तर इतरांनी निराशा केली. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर बार्यडन कार्स आणि शोएब बशीर या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.