ENG vs IND, 1st Test: केएल राहुलची अर्धशतकाकडे वाटचाल, पण पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला; भारताकडे मोठी आघाडी
esakal June 23, 2025 07:45 AM

इंग्लंड विरुद्ध भारत संघात हेडिंग्लेमध्ये होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा (२२ जून) खेळ शेवटच्या सत्रात आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर थांबवण्यात आला.

तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ वरचढ दिसत असून भारताकडे ९६ धावांची आघाडी आहे. केएल राहुल अर्धशतकाकडे वाटचाल करत असून तो आता चौथ्या दिवशी मोठी खेळी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

ENG vs IND, 1st Test: अंपायर ऐकतच नाही! गिल-बुमराहने प्रयत्न केले, रिषभ पंतने तर रागात बॉलच फेकला; जाणून घ्या नेमकं काय झालं

या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ५० व्या षटकापासून ३ बाद २०९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी ऑली पोप १०० धावांवर आणि हॅरी ब्रुक शून्यावर नाबाद होता. या दोघांनी तिसऱ्या दिवशी आक्रमक सुरुवात केली. पण पोपला फार काळ प्रसिद्ध कृष्णाने टिकू दिले नाही. त्याने पोपला १०६ धावांवर रिषभ पंतच्या हातून झेलबाद केले.

पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि ब्रुक यांच्यात ५१ धावांची भागीदारी झाली, तर स्टोक्स २० धावांवर बाद झाल्यानंतरही जॅमी स्मिथसोबत ब्रुकने अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान, ब्रुकने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. पण स्मिथला प्रसिद्ध कृष्णानेच ४० धावांवर बाद केले. त्याचा अफलातून झेल रवींद्र जडेजा आणि साई सुदर्शनने घेतला.

पण नंतर ख्रिस वोक्स ब्रुकला साथ देत होता. ब्रुकने आक्रमक खेळत शतकाकडे वाटचालही केली होती. यादरम्यान, त्याचा एक झेल यशस्वी जैस्वालने सोडल्याने त्याला जीवदान मिळाले होते. पण तो ९९ धावांवर असताना प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरने त्याचा झेल घेतला.

पण नंतर वोक्स आणि ब्रायडन कार्स यांच्यात ८ व्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी झाली. पण कार्सला २२ धावांवर मोहम्मद सिराजने आणि वोक्सला ३८ धावांवर जसप्रीत बुमराहनेत्रिफळाचीत केले. शेवटची विकेटही बुमराहने जोश टंगला ११ धावांवर त्रिफळाचीत करत घेतली. यासोबतच त्याने ५ विकेट्सही पूर्ण केल्या.

ENG vs IND: ६५०+ विकेट्स घेणाऱ्या दिग्गज गोलंदाजाचे निधन; भारत-इंग्लंडच्या खेळाडूंनीही वाहिली श्रद्धांजली

बुमराहने दुसऱ्या दिवशी झॅक क्रावली (४), बेन डकेट (६२) आणि जो रुट (२८) यांना बाद केलं होतं. इंग्लंडचा पहिला डाव १००.४ षटकात ४६५ धावांवर संपला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ धावा केलेल्या असल्याने भारताला ६ धावांची आघाडी मिळाली होती.

भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना बुमराहने ५ विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या सत्रात दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला फलंदाजीला उतरले. पहिल्या डावातील शतकवीर जैस्वालला दुसऱ्या डावात खास काही करता आले नाही. त्याला चौथ्या षटकात ४ धावांवर ब्रायडन कार्सने जॅमी स्मिथच्या हातून झेलबाद केले. पण पहिला सामना खेळत असलेल्या साई सुदर्शनने या डावात केएल राहुलला साथ दिली.

केएल राहुल आणि साई सुदर्शन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी झाली. पण सुदर्शनला कर्णधार बेन स्टोक्सने झॅक क्रावलीच्या हातून ३० धावांवर झेलबाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यामुळे शुभमन गिलला मैदानात उतरावे लागले.

मात्र केएल राहुल अर्धशतकाच्या जवळ असताना २४ व्या षटकादरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला.खेळ थांबला तेव्हा भारताने २३.५ षटकात २ बाद ९० धावा केल्या होत्या. केएल राहुल ७५ चेंडूत ४७ धावांवर नाबाद आहे. शुभमन गिल ६ धावांवर नाबाद आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.