भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी चांगली खेळी केली. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी इंग्लंडला झुंजवलं. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी 150हून अधिक धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. आता दुसऱ्या डावातही चमकला आहे. पहिल्या डावात त्याने 178 चेंडूत 134 धावांची खेळी केली होती. यात त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले होते. दुसऱ्या डावातही त्याने शतकी खेळी केली. विदेशात कसोटीत सलग 50हून अधिक धावा करण्याची किमया 5 वेळा केली आहे. गुंडप्पा विश्वनाथ आणि संजय मांजरेकर यांच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला आहे. तर दोन्ही डावात शतकी खेळी करणारा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि रोहित शर्माने ही किमया केली आहे. आता यात ऋषभ पंतची भर पडली आहे. पण इंग्लंडमध्ये एकाच डावात दोन शतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
ऋषभ पंतने 50 धावा या 83 चेंडूत केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 चौकार मारले होते. मात्र त्यानंतर ऋषभ पंतने गिअर बदलला आणि आक्रमक खेळी केली. ऋषभ पंतने पुढच्या 47 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. ऋषभ पंतने दुसरं शतक 130 चेंडूत पूर्ण केलं. यात त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले. ऋषभ पंत आणि केएल राहुलच्या या खेळीमुळे भारतीय संघ 300 जवळ पोहोचला आहे. ही जोडी फोडणं इंग्लंडच्या गोलंदाजांना जड जात असल्याचं दिसत आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचं हे पाचवं शतक आहे. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंतने शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात केएल राहुल आणि ऋषभ पंतने शतक ठोकलं आहे. त्यामुळे दुसऱ्या डावातही टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. आता चौथ्या दिवशी भारतीय संघ किती धावा करते याकडे लक्ष लागून आहे. जर भारताने 400 पार धावा केल्या तर हा सामना जिंकण्याची संधी आहे.