समजूतदारपणाचा प्रवास
esakal June 28, 2025 09:45 AM

- मिलिंद गवळी आणि दीपा गवळी

कधी कधी नात्यांची सुरुवात प्रेमानं होते; पण त्या नात्याला खरी स्थैर्य आणि जिव्हाळ्याची किनार मैत्रीच देते. अभिनेते मिलिंद गवळी आणि त्यांची पत्नी दीपा गवळी यांचं नातं हे याचं सजीव उदाहरण. जवळजवळ ४३ वर्षांचा एकत्रित प्रवास. त्यातली ३४ वर्षं विवाहाची आणि त्याआधीची ९ वर्षं प्रेमाच्या वावटळीत; पण या सगळ्यात ‘मैत्री’ फुलली ती सर्वांत शेवटी - आणि याचमुळे ती अधिक खोल, अधिक खऱ्या अर्थाने ठसलेली.

‘मी शाळेतून कॉलेजमध्ये जाणार होतो, आणि त्या दरम्यान एका लग्नात दीपाला पहिल्यांदा पाहिलं,’ मिलिंद सांगतात. ‘त्या आधी माझ्या शाळेत मुला-मुलींमध्ये संवादच नसायचा; पण दीपाला पाहिल्यावर पहिल्यांदाच वाटलं, की हिच्याशी मी माझ्या भावना व्यक्त करू शकतो.’

पहिल्या भेटीत फारसं बोलणं झालं नाही; पण पत्रव्यवहार सुरू झाला. तोही थेट नाही, तर दीपानं मिलिंदच्या बहिणीसाठी, आणि मिलिंदनं दीपाच्या भावासाठी लिहिलेली पत्रं. त्यात ‘१४३४४४’ असा कोड असे - ‘I love you very very much’. ही खास भाषा फक्त त्यांना समजायची. अखेर ते एकमेकांना थेट पत्र लिहू लागले.

मिलिंद सांगत होते, ‘सहा-सहा महिन्यांनी आम्ही भेटायचो. त्यामुळे भेटीची ओढ असायची. प्रेम सगळ्यांना कळलं. मी शिक्षण आणि कामावर फोकस केलं आणि योग्य वय झालं. तेव्हा आम्ही लग्न केलं.’

‘लग्नाआधीच्या भेटी क्षणिक होत्या, ज्यामध्ये आम्ही एकमेकांकडून खूप अपेक्षा ठेवल्या होत्या; पण लग्नानंतर वास्तव समोर आलं. व्यक्तिमत्त्वं एकदम भिन्न. संवादाचा अभाव, समज-गैरसमज यामुळे एक क्षण असा आला की वाटलं, आपण चूकच केली की काय? पण एकदा आम्ही लखनौला फिरायला गेलो आणि तिथे पहिल्यांदा दोघांनी मोकळेपणाने संवाद केला. अक्षरशः त्यावेळी डोळे पाणावले. तिथं जाणवलं, की चूक कुठे झाली.’

मिलिंद पुढे सांगतात, ‘आपण आपल्या पार्टनरकडून अपेक्षा करतो आणि त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करतो - ही सगळ्यात मोठी चूक. हे लक्षात आलं, तेव्हा आमच्या नात्यात बदल व्हायला लागले. एक कलाकार म्हणून मी झगडत असताना, माझ्या बाजूला तीच उभी होती.

आता आम्ही सकाळचा काही वेळ एकमेकांसाठी देतो. ‘दीपा खूप पारदर्शी आहे. मनात असतं तेच बोलते. मी तसा नाही. कधी-कधी मी खरं बोलतोय की ॲक्टिंग करतोय, हे मलाच कळत नाही. ती प्रामाणिक, स्पष्टवक्ती आणि ठाम आहे.’

दीपा सांगत होत्या, ‘आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांच्या सोबत आम्ही चाललो. आता मागे वळून पाहते, तेव्हा वाटतं, खूप काही घडलं... चढ–उतार आले, काही क्षण कठीण होते, काही गोड; पण या सगळ्यात आम्ही कायम एकत्र होतो.’

दीपा सांगतात, ‘मिलिंद खूप समजूतदार आहेत. आमचे स्वभाव खूप वेगळे. मी थोडी घाईत असणारी, पटकन् रिअॅक्ट करणारी, आणि ते शांतपणे विचार करणारे. मला एखादी गोष्ट सांगायची असेल, तर ते नेहमी शांतपणे समजावून सांगतात. त्यांच्या या गुणामुळे आमच्या नात्यात खूप स्थैर्य आलं.

‘मिथिलाच्या जन्माच्या वेळी मिलिंद अक्षरशः माझ्या प्रत्येक क्षणासोबत होते. तो काळ, ती साथ आजही माझ्या मनात खोलवर घर करून आहे. आम्ही दोघांनी एकत्र अनेक टप्पे पार केले आणि प्रत्येक टप्प्यावर आम्हाला जोडून ठेवणारा धागा होता मैत्रीचा आणि विश्वासाचा.’

दोघे एकमतानं सांगतात, ‘मैत्री म्हणजे जिथे आपण कोणतेही भान न ठेवता हक्काने बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो. जिथे उपस्थितीच नव्हे, तर अनुपस्थितीतही एकमेकांवरचा विश्वास टिकून राहतो. ती व्यक्ती सोबत नसली, तरी ती आपल्या पाठीशी आहे, ही भावना असते – तीच खरी मैत्री.’ ०आज ४३ वर्षांनंतरही त्यांच्या नात्यातला विश्वास, समजूतदारपणा आणि संवाद टिकून आहे आणि म्हणूनच त्यांचं नातं - खरंखुरं रेशीमनातं.

(शब्दांकन : मयूरी गावडे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.