पुरी : ओडिशातील पुरी येथे आज लक्षावधी भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली. भगवान श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ‘जय जगन्नाथ’ आणि ‘हरि बोला’ असा जयघोष, टाळ-मृदंगाचे वादन आणि शंखनाद अशा भक्तिमय वातावरणात भव्य अशा तीन रथांनी ‘बोडा डांडो’ (महामार्ग)वरून गुढीची मंदिराकडे आपली दिव्य यात्रा सुरू केली. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रभू जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ ओढले.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता पारंपरिक मंगल आरतीने विधींना सुरुवात झाला. त्यानंतर मइलाम, ताडपोलागी व रोसो होमो यांसारखे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर ‘ढाडी पोहंडी’ विधी सुरू झाला, या विधीनुसार देवांना मंदिरातून संगीतबद्ध तालबद्ध हालचालीत बाहेर आणले गेले आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून गेले. त्यानंतर दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती रथात बसविण्यात आल्या.
त्यानंतर जगन्नाथ पुरी येथील गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी रथावर जाऊन सर्वप्रथम दर्शन घेतले. त्याचप्रमाणे जगन्नाथ पुरी येथील राजघराण्यातील गजपती महाराज यांनी सोन्याच्या झाडूने मार्ग झाडला. त्यानंतर दुपारी सुमारे साडेपाच दरम्यान सर्वात आधी भगवान बलभद्र, त्यानंतर देवी सुभद्रा आणि त्यानंतर भगवान जगन्नाथाचा रथ ओढण्यात आला.
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ रथयात्रेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेनिमित्त ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, तसेच राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि इतर अधिकाऱ्यांनीही रथयात्रेत सहभाग घेतला.
दिघा येथील रथयात्रेत ममता सहभागी
दिघा : पश्चिम बंगालमधील दिघा येथे बांधण्यात आलेल्या जगन्नाथ मंदिरामध्ये आज रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती रथात ठेवण्यात आल्या, त्यानंतर रथयात्रेस सुरुवात झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रथयात्रा सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या झाडूने रथासमोरील मार्ग झाडला आणि त्यानंतर रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी रथयात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील रथयात्रेत सहभागी होते पूजाअर्चा केली. यावेळी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे सदस्यही यावेळी रथयात्रेत सहभागी झाले होते. दिघा येथे उभारण्यात आलेल्या मंदिरातील ही यंदाची पहिलीच रथयात्रा आहे.
रथाच्या मार्गावर बॅरिकेड
रथयात्रेसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत दिघा येथील रथयात्रेमध्ये रथाच्या आसपास सुमारे एक किलोमीटरपर्यंत बॅरिकेड लाऊन त्या आत भाविकांना येण्यास मनाई करण्यात आली होती. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बॅरिकेड लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांना रथाच्या दोराला स्पर्श करता यावा यासाठी बॅरिकेड जवळच रथाचे दोर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती ममता यांनी यावेळी दिली.