'विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठीचा कालावधी अवघ्या सहा तासांवर'; दर्शनरांगेचे सुक्ष्मनियोजन; व्हीआयपीला लगाम
esakal July 03, 2025 04:45 PM

-भारत नागणे

पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीने दर्शन बारीमध्ये अनेक बदल केल्याने दर्शन रांग जलद गतीने पुढे जात आहे. परिणामी ऐरवी 18 -18 तास दर्शन रांगेत उभे राहणार्या भाविकांचे आता अवघ्या सहा ते सात तासांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन होत आहे. दर्शनाचा कालवधी निम्यावर आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वारीकाळात वशिल्याचे ( व्हीआयपी) दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दर्शनाची गती आणखी वाढली आहे.

रविवारी (ता.6) आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आषाढी पालखी सोहळा पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी आहे. मागील आठवडाभरापासून भाविकांना दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने दर्शन बारीचे सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे.

दर्शनबारीमध्ये घुसखोरी होऊ नयेयासाठी दर्शनबारीला जाळी लावण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वशिल्याचे दर्शन बंद केल्याने दर्शन रांगेतील भाविकांन लवकर दर्शन मिळू लागले आहे. सध्या दर्शन रांगेत 50 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना केंद्रबिंदू ठेवून मंदिर समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊनये यासाठी पंखे,कुलरची सोय केली आहे.

याशिवाय चहा, नाश्ता, जेवण, फराळाचीही सोय केली आहे. वारीकाळात अधिकाधिक भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने नियोजन केले आहे. पूजा आणि स्वच्छतेचा कालावधी वगळता सुमारे 22 तास मंदिर दर्शनासाठी खुले आहे. भाविकांनी दर्शन रांगेतून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

व्हीआयपी दर्शनाला लगाम

विठ्ठल रुक्मिणी हे लाखो भाविकांचे आराध्यदैवत आहेत. लाडक्या देवाला भेटण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर पायी येऊन भाविक दर्शन रांगेत उभे राहातात. या भाविकांना वेळेत आणि सुलभपध्दतीने दर्शन व्हावे यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. मध्यंतरी व्हीआयपी दर्शनासाठी येणार्या काही लोकांमुळे दर्शन रांग विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक वाद ही निर्माण झाले होते. वारीकाळात व्हीआयपी दर्शनामुळे दर्शनरांग विस्कळीत होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे वशिल्याच्या दर्शनाला पायबंद बसला आहे. व्हीआयपी दर्शनामुळे दर्शन रांग रखडत होती. दर्शन रांगेत सुधारणा केल्यामुळे भाविकांना कमी वेळात आणि सुलभपध्दतीने दर्शन मिळू लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.