आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू असून आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांचे मनोब वाढवलं. तर त्यानंतर थोड्याच वेळाच शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आझाद मैदानात येऊन आंदोलकांशी संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी हातात मेगा फोन घेऊन आंदोलकांना संबोधित केलं, त्याचवेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवरही जोरदार निशाणा साधला.आता आपण सगळ्यंनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उडून पडले पाहिजेत,अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारला जोरदार चिमटा काढला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
त्यांनी ज्यांनी माईकचा आवाज बंद केला असेल पण आपला आवाज कोणीही बंद करू शकणार नाही. त्यांना वाटत असेल त्यांनी आपला करंट काढला. पण आता आपण सगळ्यंनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उडून पडले पाहिजेत. मी तुम्हाला वचन द्यायला आलोय. जी गोष्ट मी तुम्हाला, आपलं सरकार असताना हो म्हटलं होतं. तुम्ही एकजुटीने सोबत राहिला तर तुमच्या हक्काचं जे आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही,असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात अन्याय होतोय
आपण नेहमी म्हणतो आपली संस्कृती आहे. पितृदेव भव:, मातृदेव भव: आणि गुरूदेव भव: असं आपण म्हणतो. पण यांचे गुरू कोण? जे दिल्लीत बसलेत. आणि त्या गुरुच्या आडून अन्याय सुरू आहे. बाजूला गिरणी कामगार आहेत. इथे तुम्ही आहेत. एकूणच महाराष्ट्रात अन्याय होतोय. आपण सर्व मिळून एकवटलो तर त्यांना एकच धडा शिकवूया की हे वळवळ करायला शिल्लक राहणार नाही, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला.
आता थांबायचं नाही
शिवसेना तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत राहील. हे वचन देतो. आपला विजय मिळाल्यावर मी परत येईन. पुन्हा येईन हे फार बदनाम झालं आहे. तसं नाही, मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं. आता विजय मिळेपर्यंत थांबायचं नाही. विजय सुद्धा याच ठिकाणी साजरा करूया हे वचन देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.