दिल्लीत आज सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना महिला काँग्रेस खासदारावर लूटमारीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार एम. सुधा या तमिळनाडू भवनजवळ पहाटे फिरायला गेल्या होत्या, तेव्हा ही घटना घडली. काही गुंडांनी येऊन त्यांची सोन्याची साखळी हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर त्यांनी आरडाओरड केली, पण कोणीही मदतीला आले नाही. यानंतर लोकांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. चाणक्यपुरी येथे अनेक दूतावास आणि राज्य सरकारांचे अधिकृत निवासस्थानही आहेत.
माजी मंत्र्यांचा सरकारवर निशाणा
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेवर विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीतील भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर सरकारवर हल्ला करत लिहिले की, दिल्लीत ही कोणती नवीन घटना नाही. ही रोजची बाब आहे. दिल्लीत साखळी, मोबाइल चोरीच्या घटना इतक्या सामान्य झाल्या आहेत की लोक FIR दाखल करण्यापासूनही घाबरत नाहीत. लोकांना माहित आहे की काहीही होणार नाही.
वाचा: गॅसमुळे छातीत दुखतय की हार्ट अटॅक? जाणून घ्या दोघांमधील फरक आणि लक्षणे
पोलिसांचा तपास सुरु
या प्रकरणी पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रकरण नोंदवण्यात आले आहे आणि तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासाठी अनेक पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, पोलिस प्रत्यक्षदर्शींशी बोलत आहेत आणि घटनेच्या वेळी परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचालींची तपासणी करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तमिळनाडू भवन आणि आसपासच्या परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
महिला खासदाराची गृहमंत्रालयाकडे विनंती
दरम्यान, तमिळनाडूच्या मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या आर. सुधा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज सकाळी चाणक्यपुरी परिसरात पोलंड दूतावासाजवळ घडलेल्या या घटनेत त्यांची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली आणि त्यांना जखमा झाल्या. त्यांनी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की, अधिकाऱ्यांना गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे निर्देश द्यावेत.