सीआयएसएफमध्ये
१४ हजारांची पदभरती
रत्नागिरी : औद्योगिक सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी गृहमंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाची (सीआयएसएफ) अधिकृत संख्या सध्याच्या १ लाख ६२ हजारावरून वाढवून २ लाख २० करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे दरवर्षी १४ हजार युवकांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही अनेकांना रोजगार मिळू शकतो. सीआयएसएफने रत्नागिरीमध्ये प्रसिद्धीपत्रात या संबंधीची विस्तृत माहिती दिली आहे. विमान वाहतूक, बंदरे, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, अणुप्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, जम्मू-काश्मीरमधील कारागृहे यामध्येही सीआयएसएफच्या तैनातीला मजबुती मिळणार आहे. बलाच्या संख्येत वाढ ही रोजगाराच्या नव्या संधी आहेत. २०२४ मध्ये १३ हजार २३० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. २०२५ मध्ये २४ हजार ९८ पदांवरील भरतीप्रक्रिया सुरू आहे. पुढील पाच वर्षांपर्यंत दरवर्षी सुमारे १४ हजार नवीन जवान सीआयएसएफमध्ये सामील केले जातील. संख्या वाढल्याने नव्या बटालियनच्या स्थापनेचा मार्गही मोकळा होईल. अंतर्गत सुरक्षा, आपत्कालीन तैनातीसाठी त्यांचा उपयोग होईल. मागील वर्षी सीआयएसएफने सुरक्षा विभागांतर्गत सात नवीन युनिट्स सुरू केली. भारताच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाच्या गतीला अनुरूप मजबूत आणि सतर्क सुरक्षायंत्रणा देण्याचे काम सीआयएसएफ करणार आहे.