बायकोसोबत वाद, पतीन चार मुलांसह उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी मारुन संपवलं आयुष्य
Tv9 Marathi August 17, 2025 11:45 AM

अहिल्यानगरमधून ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे,  बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आपलं जीवन संपवलं आहे. अरुण काळे ( वय 30 वर्ष ) राहणार चिखली कोरेगाव , तालुका श्रीगोंदा असं आत्महत्या केलेल्या या व्यक्तीचं नाव आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून मग स्वत: आमहत्या केल्याचं समोर आलं आहे, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील कोहाळे शिवरात घडली आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार आपत्यांना विहिरीत ढकललं आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार बायको नांदायला येत नाही, म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह आत्महत्या केली आहे.

शिवानी अरुण काळे ( वय 8 ) , प्रेम अरुण काळे ( वय 7 ) वीर अरुण काळे ( वय 6 ) , कबीर अरुण काळे ( वय 5 ) अशी या घटनेतील मृतांची नावं आहेत. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. एक पाय आणि एक हात दोरीने बांधलेल्या अवस्थेमध्ये अरुण काळे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे.

बायकोसोबत वाद 

समोर आलेल्या माहितीनुसार अरुण काळे यांचा आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीशी वाद झाला होता, या वादामुळे त्यांची पत्नी आठ दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी येवला येथे गेली होती. मात्र बायको घरी येत नसल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचल्याची माहिती समोर येत आहे, आधी त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकललं आणि नंतर त्यांनी विहिरीत उडी घेतली असावी असा अंदाज आहे.

दरम्यान  विहिरीपासून काही अंतरावर काळे यांची मोटर सायकल आढळली आहे. श्रीगोंदा येथून अरुण काळे हे आपल्या चार मुलांसह मोटारसायकलवर राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारात आले होते,  को-हाळे शिवारात शिर्डी – नगर बायपासच्या कडेला मोटरसायकल लावून ते विहिरीपर्यंत गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.