India-US Relation : भारतावर आमचं…टॅरिफवरुन वाद सुरु असताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच मोठं वक्तव्य
Tv9 Marathi August 18, 2025 03:45 PM

टॅरिफच्या मुद्यावरुन सध्या भारत-अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारला आहे. यामुळे भारताच आर्थिक नुकसान होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका पक्षपाती आणि दुटप्पीपणाची आहे. एकाबाजूला भारतावर ते इतका प्रचंड टॅरिफ आकारत असताना पाकिस्तान, बांग्लादेश, चीन यांना मात्र सवलत देत आहेत. त्या देशांच्या बाबतीत ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतल्याच चित्र आहे. टॅरिफवरुन हा सर्व वाद सुरु असतानाच आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी भारत-पाकिस्तानवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. “भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर आम्ही दररोज बारीक लक्ष ठेऊन आहोत, दोन्ही देशांमधील युद्धविराम लवकरच तुटू शकतो” असं मार्को रूबियो यांनी म्हटलं आहे. युद्धविराम हाच परस्परांवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही बाजूंना थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे असं रुबियो म्हणाले.

“युद्धविरामाच्या बाबतीत सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तो टिकवून ठेवणं. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, आम्ही भारत-पाकिस्तान तसच कंबोडिया-थायलंडमध्ये दररोज काय सुरु आहे, त्यावर लक्ष ठेऊन आहोत” असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, “युद्धविराम तुटू शकतो. आम्ही स्थायी युद्धविरामासाठी प्रयत्न करतोय, यावर कोणीही असहमत होणार नाही. एका शांती करार आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे आताही युद्ध होणार नाही आणि भविष्यातही होणार नाही”

रुबियो अजून काय म्हणाले?

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रुबियो यांनी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सैन्य संघर्षाचा दाखला दिला. त्या बद्दल डोनाल्ड ट्रम्प आपणच हे युद्ध थांबवल्याचा सतत दावा करत असतात. रुबियो म्हणाले की, “आपण भाग्यवान आहोत. आपल्याला राष्ट्रपतींचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी शांतता स्थापित करण्याला आपल्या प्रशासनाची प्राथमिकता बनवलं आहे” “आपण कंबोडिया-थायलंड, भारत-पाकिस्तानमध्ये हे पाहिलय. आम्ही खांडा आणि डीआरसीमध्ये हे पाहिलय. जगात शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही मिळणाऱ्या प्रत्येक संधींचा उपयोग करु” असं मार्क रुबियो म्हणाले.

ट्रम्प यांचा 40 वेळा एकच दावा

आपणच भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणला, असा डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 40 वेळा दावा केला आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प हे आपणच भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणल्याचा दावा करतात. 10 मे रोजी भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला. ट्रम्प यासाठी व्यापाराच अस्त्र वापरल्याचा दावा करतात. भारत-पाकिस्तान लढत असताना मी व्यापाराची धमकी देऊन युद्धविराम घडवून आणला असा ट्रम्प यांचा दावा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.