Maharashtra Live Updates : अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही, जरांगे यांची फडणवीसांवर टीका
Sarkarnama August 28, 2025 11:45 PM
Sanjay Raut:फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात: राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत. यापूर्वी महायुती सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जरांगेंशी चर्चा सुद्धा केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात असे राऊत म्हणाले. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ही मराठी माणसांची राजधानी आहे. जर मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते. त्याला सरकार परवानगी देते तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange live: आठमूठे भूमिका सोडून द्या...

'अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची मुख्यमंत्र्यांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.', असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. जुन्नर येथून मुंबईकडे रवाना होताना जरांगे माध्यमांशी बोलत होते.

Maratha Reservation: भाजपकडून खारघरमध्ये बॅनरबाजी

मराठा आंदोलक मनोज जरांगे शुक्रवारी मुंबईत येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून खारघरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड, निरंजन डावखरे नरेंद्र पाटील यांनी हा बॅनर लावलेला आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडवणीस, अशा प्रकारचा मजकूर बॅनरवर आहे.

Dharashiv : मराठा-ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये जमावबंदी

मराठा आणि ओबीसी समाजांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. उपोषण, मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, सभा घेण्यास धाराशिवमध्ये बंदी घालण्यात आली आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

Maratha Reservation : इतिहास शिव्यांना नव्हे तर इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो; भाजपकडून मुंबईत बॅनरबाजी

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या जुन्याच मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात करणार आहेत. यासाठी जरांगेसंह त्यांचे राज्यभरातील समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. तर जरांगे मुंबईत दाखल होण्याआधी भाजप नेत्यांकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजीने करण्यात आली आहे. या बॅनरवर 'इतिहास शिव्यांना नव्हे तर इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो'; असं लिहिलं आहे. शिवाय मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते, असाही उल्लेख बॅनवर करण्यात आला आहे.

ॠषिपंचमीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून दरवर्षी अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही ते करण्यात आलं होतं. यावेळी ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी एकत्रित अर्थवशीर्ष पठण केलं.

OBC : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बोलावली तातडीची बैठक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालीत वेग आला असतानाच आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठकी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बोलावली असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.

RSS : मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको- मोहन भागवत

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि अस्थिरता वाढत आहे. धर्म सर्वत्र पोहोचला पाहिजे. मात्र त्याचा अर्थ धर्मांतर करणे नव्हे, धर्म म्हणजे एक जीवनस्वभाव आहे. तर सामाजिक समरसतेवर बोलताना ते म्हणाले, "मंदिर, पाणी आणि स्मशान हे सर्वासाठी खुलं असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव असायला नको."

Nagpur Crime : नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याची 23 लाखांनी फसवणूक

नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची 23 लाखांनी फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पेठे यांच्या खात्यातील परस्पर शेअर अन्य खात्यात ट्रान्सफर करून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी नंदन ओमप्रकाश गोस्वामीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल

मनोज जरांगे पाटील काल अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यानंतर रात्रीच्या मुक्कामानंतर ते आता शिवनेरीवर दाखल झाले आहेत. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

Virar Building Collapses : विरार इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू

विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य एनडीआरफ पथक आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.