GST बदलामुळे स्मार्टफोन्स महागले का? जास्त पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या
Tv9 Marathi September 06, 2025 12:45 AM

सणासुदीच्या दिवसांमध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापार करणाऱ्यांना नवीन जीएसटी कर सवलत दिल्याने मोठा दिलासा मिळालेला आहे. अनेक उत्पादनांवरील जीएसटी कमी करून सामान्य माणसाच्या खिशावरील भार कमी करण्यात आला आहे. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असणार आहेत. सणांच्या या हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफलाइन ते ऑनलाइन सर्वत्र आकर्षक ऑफर्स देण्यात येतात. उत्पादनांवरील उत्तम ऑफर्समुळे केवळ स्मार्ट टीव्ही आणि एसीच नाही तर लोक जुन्या ते नवीन वस्तु अपग्रेड करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे दरवर्षी सणासुदीत इलेक्ट्रनिक्स तसेच इतर वस्तुंची मोठी विक्री होते. तर आपल्या देशात वस्तु व सेवा कराच्या रचनेत मोठा बदल केल्याने अनेक ग्राहकांना खरेदी साठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पाऊल उचलण्यात आले आहे. तर दुसरी कडे मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या मोबाईल फोन खरेदीवर नवीन जीएसटी दरात कोणत्याही प्रकारे कर सवलत दिली जाणार नाहीये. त्यामुळे मोबाईलच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही.

5% जीएसटी स्लॅब अपेक्षित होता

मोबाईल फोनवरील जीएसटी स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नसल्यामुळे स्मार्टफोन अजूनही पूर्वीसारखेच महाग आहेत. मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना मोबाईल फोनवरील जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा होती, परंतु सरकारने तसा निर्णय घेतला नसल्याने मोबाईल स्वस्त होण्याची शक्यता नाही.

जर जीएसटी 18% वरून 5% पर्यंत कमी केला असता, तर मोबाईल फोनच्या किमतीत मोठी कपात झाली असती तर या दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी वाढ झाली असती. अशातच 18% जीएसटी कायम ठेवण्याचा सरकारचा निर्णय झाल्यानंतरही तुम्हाला मोबाईल फोन खरेदीवर 18% जीएसटी भरावा लागेल.

भारतात मोबाईल क्षेत्र किती मोठे आहे?

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारताच्या मोबाईल फोन क्षेत्राचे उत्पादन आर्थिक वर्ष 2025 मध्ये 5.45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे आर्थिक वर्ष 2015 मध्ये 18,900 कोटी रुपयांवरून वाढले आहे, तर निर्यात 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. यामुळे, भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.