IND vs UAE : T20I मधील सर्वात मोठा विजय ते लहान सामना; सूर्याच्या टीम इंडियाने नोंदवले ८ भन्नाट विक्रम... टॉस पराभवाची मालिकाही खंडित
esakal September 12, 2025 01:45 PM
  • भारताने UAE वर ९ विकेट्सने आणि ९३ चेंडू राखून सर्वात मोठा T20I विजय मिळवला.

  • UAE संघ फक्त ५७ धावांत गडगडला, ही त्यांची T20I मधील निचांक खेळी ठरली.

  • कुलदीप यादवने ४-७ अशी गोलंदाजी करून आशिया कपातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी केली.

India Registers Biggest T20I Win, Ends Toss-Loss Streak : भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत दणदणीत विजयाने सुरुवात केली. दुबळ्या संयुक्त अरब अमिरातीवर ९ विकेट्स व ९३ चेंडूंत विजय मिळवून अ गटातील गुणखाते उघडले. कुलदीप यादव ( ४-७) व शिवम दुबे ( ३-४) यांच्या भेदक माऱ्यासमोर यूएईचा संघ ५७ धावांवर गडगडला आणि भारताने ४.३ षटकांत मॅच जिंकली. या विजयासह सूर्यकुमार यादवच्या टीमने ८ मोठ्या विक्रमाची नोंद केली.

५७

यूएईचा संघ आशिया चषक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात ५७ धावांवर गडगडला... भारताविरुद्ध पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यातील ही निचांक धावसंख्या आहे. यापूर्वी २०२३ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६६ धावांत गार झाला होता.

यूएई ५७ धावांवर ऑल आऊट झाला आणि ही त्यांची निचांक खेळी ठरली. यापूर्वी ते २०२४ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध ६२ धावांवर सर्वबाद झाले होते.दुबईतच हा सामना झाला होता. आशिया चषकाच्या ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील ही दुसरी निचांक धावसंख्या ठरली. २०२२ मध्ये शाहजाह येथे हाँगकाँगचा संघ पाकिस्तानविरुद्ध ३८ धावांवर ऑल आऊट झाला होता.

Asia Cup 2025: UAE संघाला २७ चेंडूतच हरवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आता पाकिस्तानविरुद्ध...' ९३

भारताने कालच्या सामन्यात ९३ चेंडू राखून विजय मिळवला आणि हा भारताचा ट्वेंटी-२० सामन्यातील चेंडू राखून मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला. २०२१ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध ८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारताने ८१ चेंडू राखून यशस्वीपणे केला होता.

आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांमध्ये हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. इंग्लंडने मागच्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेत ओमान विरुद्ध १०१ चेंडू राखून ४८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आशिया चषक स्पर्धेत भारताशिवाय एकाही संघाला दहापेक्षा जास्त षटकं राखून विजय मिळवता आलेला नाही.

कुलदीप यावदने काल ७ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि आशिया चषक स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. २०२२ मध्ये भूवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीपने ट्वेंटी-२० मध्ये चार सामन्यांत चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि भुवनेश्वरने पाचवेळा असा पराक्रम केला आहे.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चारवेळा एका षटकात तीन विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. युझवेंद्र चहलने दोनवेळा असे षटक फेकले होते. एकंदर राशीद खान ( ६) या विक्रमात कुलदीपच्या पुढे आहे.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

यूएईच्या शेवटच्या सात फलंदाजांना धावसंख्येत फक्त १० धावा जोडता आल्या. यापूर्वी फक्त एकदाच तळाच्या सात विकेट्सनी १० धावांचे योगदान दिले होते. २०१७ मध्ये इंग्लंडचा डाव ३ बाद ११९ वरून १२७ धावांवर गडगडला होता.

१७.४ षटकांत यूएई आणि भारत यांचा सामना संपला आणि आशिया चषक स्पर्धेतील हा सर्वात लहान सामना ठरला. यापूर्वी २०२२ मध्ये अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्यातला सामना २९.५ षटकांत संपला होता.

भारतीय संघाने सलग १५ सामन्यांत टॉस गमावण्याची मालिका खंडीत केली. जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने शेवटचा टॉस जिंकला होता. त्यानंतर काल सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही टॉस गमावण्याची ही सर्वात मोठी मालिका ठरली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.