मनमाड: वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने मनमाड रेल्वे स्थानक परिसरात छापा टाकून हरणाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली. या संशयित आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सुरेश चव्हाण (वय ३९, रा. हेंकलवाडी, धुळे), प्रवीण रमेश बनसोड (रा. वर्धा), मारुती लक्ष्मण उईके (रा. ढाकुलगाव, अमरावती) आणि अभिलाल अर्जुन पाटील (रा. सडगाव, धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट आणि वन्यजीव व वनीकरणचे सहायक वनसंरक्षक शिवाजी सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व केले.
हार्दिक पांड्याच्या माजी सहकाऱ्यासह दोघांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक; ३२ लाखांचा घोटाळा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरणया कारवाईत मनमाडचे वनपाल जयप्रकाश शिरसाट, वनरक्षक विजय दोंदे, अमोल पाटील, विष्णू राठोड, संजय बेडवाल, विजय टेकनर, संतोष दराडे, पंकज नागपुरे, सोनाली वाघ, वंदना खरात आणि वाहनचालक सुनील भुरुक यांनी सहभाग घेतला. जप्त केलेली हरणाची कातडी पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.