Bhandara Political News : राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आणि तालुकापातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. स्थानिक नेतेमंडळी आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. काही नेते तर गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली निष्ठा बदलून तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेऊ पक्षबदल करताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता भंडारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गटात चढाओढ पाहायला मिळत आहे. तिथे भाजपच्या महिला उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे भांडाऱ्यात भाजपाला धक्का असल्याचे मानले जात आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या पक्षबदलाला तसेच पक्षप्रवेशांना उधाण आलं आहे. नुकतेच भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भूरे यांनी आज (19 ऑक्टोबर) शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला. कल्याणी भूरे यांचा हा निर्णय म्हणजे तिथे भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला भंडारा जिल्ह्याला नवचैतन्य मिळाले आहे. भूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तिथे पक्ष अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भूरे यांच्या प्रवेशानंतर भाजप महिला आघाडीत नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे रंग पहायला मिळणार आहेत.
ठाकरेंच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेशदुसरीकडे ठाणे- मुंबईतही मोठी घडामोड घडली आहे. येथे ठाकरे गटाला शिंदे गटाने जबर धक्का दिला आहे. येथे मुंबईचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यासह आज आज एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अहिल्यानगर आणि मुंबईतील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश झाला आहे. दहिसरमधील ठाकरे गट शाखा प्रमुख अक्षय राऊत यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत यांनीही शिंदेच्या पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान, आता भविष्यातही काही स्थानिक नेते आणि पदाधिकारी पक्षबदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या नेमका कोणाला कसा धक्का बसेल? हे मात्र सांगता येत नाही. सध्यातरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कधी होते? याचीच सगळे वाट पाहात आहेत.