राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, या निवडणुका प्रचंड प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र अजूनही या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याबाबत कोणतंही चित्र स्पष्ट नाहीये.
त्यातच महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असा दावा करण्यात येत आहे, परंतु दुसरीकडे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून मात्र स्वबळाचा नारा दिला जात असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती होणार की तीनही पक्ष स्वबळावर लढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. विरोधकांना जिथं फायदा, तिथं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीचा देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राज ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.